
मुंबई । Mumbai
राज्यतील विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यातील काही नद्यांना पूर आला आहे. तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा ही सुट्ट्या दिल्या आहेत. तर नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पावसाचे उशीरा आगमन झाले असले, तरही जुलै महिन्यात पावसाची जोरदार बँटिंग सुरू आहे.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, पालघर आणि मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महााष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
सध्या मुंबईसह ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुणे जिल्ह्यात धरण परिसरात सुरु असलेल्या पावसानं धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या पात्रात सुरू करण्यात आला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून धरण क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात सोमवारी संध्याकाळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून याची तीव्रता मंगळवारी वाढली. हे क्षेत्र अधिक तीव्र होत असून ते वायव्य दिशेने सरकत आहे. या प्रणालीसोबतच अरबी समुद्रात दक्षिण कोकण ते उत्तर केरळपर्यंत किनारपट्टी भागात ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे क्षेत्रही महाराष्ट्राजवळ प्रभावशाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून हा जोर २८ जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.