
पिंपरी चिंचवड| Pimpri Chinchwad
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या (Maharashtra State Grape Growers Association) वतीने ६३ व्या द्राक्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांची तुफान टोलेबाजी झाली.
'मी अजून दारूला स्पर्शही केलेला नाही! असे अजित पवार सभागृहात बोलताना म्हणाले आणि कार्यक्रमात एकच हशा पिकला. दरम्यान या ६३ व्या वार्षिक मेळाव्याच्या उद्घाटनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता अजित पवार याच्या भाषणाने झाली.
काय म्हणाले अजित पवार
देशी दारुच्या दुकानांना वाईन शॉप म्हटले जाते. त्यामुळे काहींचा असा समज झाला की सरकार वाईनची दुकाने वाटणार का? मुळात वाईनची दुकाने आणि द्राक्षापासून तयार केली जाणारी वाईन यामध्ये फरक आहे. काही देशांमध्ये तर वाईन हा पाण्याला असणारा पर्याय आहे. मी हे सगळे अधिकारवाणीने सांगतोय कारण मी अद्याप दारुला स्पर्शही केलेला नाही.
दर्दी लोक सांगतात इतर काही गोष्ट घेतली की किक बसते, वाईनने किक बसत नाही. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. मी कधीच त्या गोष्टीला स्पर्श केला नाही. माझ्या सोबत काम करणाऱ्या अनेकांना माहिती आहे असेही अजित पवार म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
तर पुढे अजित पवार म्हणाले की, 'मी अर्थमंत्री अन् उपमुख्यमंत्री असल्याने तुम्ही मला आज मोठेपण दिले. आता तुम्ही अजित पवारला आज बोलावले, का बोलावले? कारण अजित पवारकडे अर्थ खाते आहे. उपमुख्यमंत्री पद आहे. त्याच्याकडून आपले काम होईल, म्हणून त्याला मोठेपण दिले. त्याला ही वाटेल द्राक्ष बागायतदार आपल्याला विसरला नाही. तुमच्या जागी मी असतो तर हेच केले असते,' असे अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
शरद पवारांनीही या द्राक्ष परिषदेला हजेरी लावली होती. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदरणीय शरद पवारसाहेब नेहमीच तुमच्या मदतीला धावले. ते कृषिमंत्री असल्यापासून शेतकऱ्यांच्या मदतीला येतात. म्हणूनच या परिषदेच्या शुभारंभाला शरद पवारसाहेब आले होते. आज समारोपाला अजित पवार आलेत.
आता सगळे म्हणतील काय पवार-पवार चालवलेय. मुळातच तुमच्या द्राक्ष बागायतदार संघाचे चेअरमनचं शिवाजी पवारच आहेत! आता सगळेच पवार म्हटल्यावर पवारांचे चाललेय काय? अशी चर्चा रंगणार, असे म्हणत अजित पवार यांनी टोलेबाजी केली. अजित पवार यांनी काल पिंपरीत केलेल्या या भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.