मुंबई | Mumbai
राज्यात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे प्रशासनाची देखील
चिंता वाढली आहे. करोनाचा उद्रेक रोखून साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात ८ किंवा १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत.
करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊन तसेच कठोर निर्बंध लादले असूनही रुग्णवाढ कमी झालेली नाही. त्यामुळेच करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. आपण हा निर्णय एकमताने घेतला पाहिजे. राज्यात लॉकडाऊन लावल्यास महिनाभरात परिस्थिती नियंत्रणात आणता येईल, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठकीत मांडले.
तसेच, १५ एप्रिल ते २१ एप्रिल यादरम्यान परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. सध्या जे नवे रुग्ण आढळत आहेत त्यात तरुणवर्गाचा सर्वाधिक समावेश आहे. करोनाचे रोजचे आकडे काळजी वाढवणारे आहेत. यंत्रणांवर ताण येत आहे. त्यातून यंत्रणांचा शक्तिपात होऊ नये यासाठी आपल्याला ठोस पावले टाकावी लागणार आहेत. काहीही करून करोनाची साखळी आपल्याला तोडावीच लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय दिसतो आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
फडणवीस काय म्हणाले...
बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राजकारण करू नका, हा सल्ला आम्हाला देताना सत्ता पक्षातील मंत्री रोज मुलाखती देत सुटत असतील, तर आमच्याकडून एकतर्फी सहकार्याची अपेक्षा करणे, योग्य ठरणार नाही. जनभावनेचा विचार आणि कोरोनाचा प्रतिबंध यातील सुवर्णमध्य साधणारा निर्णय असावा, अशी आमची भूमिका आहे.