मुंबई -
आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या आंदोलनाला उद्यापासून (21 सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. परभणीत हे आंदोलन केले जाईल. त्यानंतर पुढे प्रत्येक
जिल्ह्यात, तालुका पातळीवर आंदोलन करण्यात येईल. महाराष्ट्रातून धनगर समाजाचे नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने वेळ द्यावा, मार्ग काढावा, अन्यथा आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी घेतली आहे.
दरम्यान यापूर्वी धनगर समाजाचा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला नाही तर मोठं जन आंदोलन उभारु, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अद्याप भेटायची वेळ दिलेली नाही. त्यांना भेटूनच धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पुढील वाटचाल ठरवू, असेही प्रकाश शेंडगे यांनी सांगितले होते.
मराठा आरक्षण मागताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका आहे. यापूर्वीचा 58 मोर्च्यांमध्ये 40 टक्के जनता ही दलित बहुजन होती म्हणून पाठिंबा दिला होता. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. त्यावरचे आरक्षण त्यांनी घ्यावं. जर त्यांना मान्य असेल तर मग आम्ही खांद्याला खांदा देत त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ, अशी भूमिका प्रकाश शेंडगे यांनी मांडली होती. मात्र आता मराठा आंदोलनानंतर धनगर समाजही आंदोलनात उतरणार आहे.