मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ माजवला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाळीव प्राण्यांसह शेतपीके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असा स्थगन प्रस्ताव आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडला.
यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सविस्तर माहिती दिली आहे. फडणवीस म्हणाले, "अवकाळी पावसामुळं एकूण आठ जिल्ह्यांमध्ये साधारण १३,७२९ हेक्टर एवढं नुकसान झालं आहे. पालघरमध्ये विक्रमगड आणि जव्हार या भागात ७६० हेक्टरमध्ये आंबा आणि काजूचं नुकसान झालंय. नाशिकमध्ये कळवण, नाशिक, त्रंबकेश्वर, निफाड या भागांत २,६८५ हेक्टरवर गहू, भाजीपाला, द्राक्ष आणि आंब्याचं नुकसानं झालं आहे.
धुळ्यात साखरी, शिनखेडा, शिरपूर ३१४४ हेक्टरचं नुकसानं झालं आहे. यामध्ये मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, पपई याचं नुकसान झालं आहे. नंदुरबारमध्ये नंदुरबार, नवापूर, अक्कलकुव्वा, शहादा, तळोदा, अक्रानी इथं १,५७६ हेक्टरचं मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, आंबा याचं नुकसान झालं आहे.
जळगाव इथं भुसावळं, धरणगाव इथं २१४ हेक्टरवर गहू, मका, ज्वारी, केळी याचं नुकसानं झालं आहे. तर अहमदनगर जिल्ह्यांत राहुरी, नेवासा, अकोले, कोपरगाव इथं ४,१०० हेक्टरवर मका, गहू, कांदा, भाजीपाला याचं नुकसानं झालं आहे. तर बुलडाण्यात नांदुरा इथं ७७५ हेक्टरवर मका, गहू, कांदा, ज्वारी, हरभरा याचं नुकसान झालं आहे. वाशिममध्ये ४७५ हेक्टरवर चार तालुक्यांत गहू, हरभरा, फळपिकं असं एकूण १३,७२९ हेक्टरवर नुकसान झालेलं आहे.
दरम्यान, विरोधकांनी इतर भागात झालेल्या नुकसानाची उल्लेख केला. त्यावरू फडणवीस म्हणाले, आता आलेली माहिती दिली आहे. अजून माहिती येणार आहे. एवढी घाई करू नका. मग आता मला बोलावं लागेल की, मागच्या काळात चक्रीवादळ आलं, त्याचे पैसे आतापर्यंत दिले नाहीत. कशाला पॉलिटिकल बोलायला लावता? कशाला राजकीय बोलायला लावता? राजकीय विषय नाहीये हा. हा विषय शेतकऱ्यांचा आहे. याच्यावर का राजकारण करता? या विषयावर राजकारण करू नका. आतापर्यंत आलेली ही सगळी माहिती आहे. मदतीसंदर्भात तात्काळ प्रस्ताव मागवले आहेत. या सगळ्या ठिकाणी तात्काळ मदत करण्यात येईल आणि उर्वरित माहिती घेऊन सगळं निवेदन केलं जाईल.
अजित पवार विधानसभेत काय म्हणाले?
अवकाळी पाऊस पडेल, गारपीट होईल याबद्दल हवामान विभागाने पाच दिवसांसाठी अंदाज जाहीर केले होते. कुठल्या भागात होणार याबद्दलही अंदाज वर्तवण्यात आले होते. पावसामुळे आणि गारपिटीमुळे गहू, कांदा, टोमॅटो, हरभरा, द्राक्षे, संत्रा, आंब्याचा मोहोर, मका, ज्वारी या पिकांचं नुकसान झालं आहे. मेंढ्यासह शेतकऱ्यांच्या पाळीव प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. पिकांवर झोपून शेतकरी स्वतःचं तोंड झोडून घेतोय. हातातोंडाशी आलेली पिकं गेली. सरकार तातडीने काय मदत करणार आहे? केंद्रातील पथकं तातडीने बोलवणार आहेत का?, असे प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला.