<p>मुंबई | Mumbai</p><p>महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. </p> .<p>त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण करोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ठेवून अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.</p><p>सहा डिसेंबर रोजीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.</p><p>महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही सहा डिसेंबर रोजी अनुयायांनी अभिवादनासाठी मुंबईत येऊ नये असे आवाहन केले आहे.</p><p>या भूमिकेचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वागत केले. समितीने चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांबाबत संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले.</p><p>त्यानुसार महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात येणार आहे.</p>