
मुंबई | Mumbai
नोव्हेंबर २०२१ रोजी पालघर (Palghar News) येथील सदिच्छा साने (Sadichha Sane) नावाची तरुणी परीक्षेसाठी घरातून बाहेर पडली मात्र घरी परतलीच नाही. त्यानंतर आता जवळपास दोन वर्षांनी एमबीबीएसची (MBBS) विद्यार्थ्यीनी असलेल्या सदिच्छा साने हिच्या बेपत्ता प्रकरणाचं गूढ उलगडलं आहे.
सदिच्छा साने हिचा खून झाला असून लाइफगार्ड म्हणून काम करणाऱ्या मिठ्ठू सिंग यानं खुनाची कबुली दिली आहे. खून केल्यानंतर तिचा मृतदेह समुद्रात फेकून दिल्याचंही त्यानं सांगितलं. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत त्याने हा जबाब नोंदवला आहे.
नेमकं काय घडलं?
सदिच्छा साने दक्षिण मुंबईतील जे जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती, २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ती परीक्षेसाठी जाते सांगून घरातून निघाली, पण ती माघारी परतलीच नाही. यावेळी सदिच्छाच्या कुटुंबियांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, सदिच्छाला बेपत्ता होऊन पंधरा दिवस पूर्ण झाले त्यानंतरही तिच्याशी काहीच संपर्क होऊ शकला नाही.
यावेळी कुटुंबियांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला, यावेळी तिचा काहीच पत्ता लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला, तांत्रिक पुराव्यांवरुन तिचे शेवटचे लोकेशन वांद्रे बॅन्ड स्टॅन्ड येत होते. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी वांद्रे पोलिस ठाण्यातही धाव घेतली. गुन्हे शाखा युनिट ९ ने याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करतानाच पोलिसांनी १०० पेक्षा अधिक जणांची चौकशी देखील केली. सदिच्छाला शेवटचे जीवरक्षक मिट्टू सिंगने पाहिले होते.
असा केला होता आरोपीनं बनाव
मिठ्ठू सिंगनं पोलिसांना वेगळीच माहिती दिली होती. 'त्या दिवशी माझी ड्युटी वांद्रे बँडस्टँडवर होती. सदिच्छा एकटी होती. ती समुद्राच्या दिशेनं जात होती. ती आत्महत्या करेल की काय, असा संशय आल्यानं मी तिच्या मागे गेलो. पण आत्महत्या करणार नसल्याचं तिनं मला सांगितलं. त्यानंतर आमच्यात चर्चा झाली. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत आम्ही बँडस्टँडमधील खडकावर बसून होते. तिथं सेल्फी घेतल्यानंतर दोघेही तेथून निघून गेले, असं मिठ्ठू सिंगनं सांगितलं होतं.
असा लागला सुगावा
एका विद्यार्थिनीच्या बेपत्ता प्रकरणाची तक्रार आल्यानंतर संशयितांची चौकशी सुरू असताना सदिच्छाच्या प्रकरणात गडबड असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी मिठ्ठू सिंगला पोलिसी दट्ट्या दाखवून त्याची चौकशी केली. त्यानंतर तो घडाघडा बोलू लागला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम ३६३ (अपहरण) आणि ३६४ (ई) (खंडणीसाठी अपहरण) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
कोण आहे मिथू सिंग?
मिथू सिंगचा वांद्रे परिसरातील बँड स्टॅन्ड भागात मित्स किचन नावाचा फूड स्टॉल होता. फूड स्टॉलवर येणाऱ्या ग्राहकांसोबत सेल्फी घेऊन तो सोशल मीडियावर पोस्ट करत असे. त्यामुळे आपल्या फूड स्टॉलची प्रसिद्धी होते, असे त्याने पोलिसांना सांगितले होते. अशा प्रकारे अनेक जणांसोबत काढलेले सेल्फीही मिथूने पोलीस आणि सदिच्छा सानेच्या कुटुंबियांनाही दाखवले होते.