
जालना | Jalana
जालन्यात मराठा आंदोलकांवर (Maratha Protestors ) लाठीचार्ज करण्यात आलाय. मराठा आंदोलकांचे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन सुरु होते. आंदोलकांनी टाकलेल्या मंडपात पोलीस घुसले. यावेळी पोलिसांनी प्रचंड लाठीचार्ज (Police Lathicharged) केला. आंदोलकांकडून दगडफेक झाली, असा आरोप पोलिसांनी केला आहे. जालना जिल्ह्यातील अंतर्वली गावात (Antarvali Village) संबंधित घटना घडली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इथे मनोज जरांगे पाटील या कार्यकर्त्याने त्याच्या काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केले होते. आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. या दरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. पण ते उपोषणावर ठाम होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते.
उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला. तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला.
चार दिवसांपासून आंदोलन सुरु होते. मग गृहमंत्रालय नेमके करत काय होते? असा सवाल या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. या घटनेला पोलिस नाही तर मंत्रीच जबाबदार आहेत. अत्यंत क्रूरपणे यांना मारहाण करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाचा, गृहमंत्र्यांच्या जाहीर निषेध करतो. हे गृहमंत्रायलाचे अपयश आहे. अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे.
“मला जालन्यातून एक-दोन लोकांचे फोन आले. तिथे काय घडले हे सांगितले. तिथे मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. पोलिसांनी मनोज जरांगे यांच्याशी विचार विनिमय केला. त्या चर्चेत सर्व शांततेने झाले होते. पण चर्चेनंतर पोलीस बळाचा वापर करुन त्यांना तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यात त्या तरुणांवर प्रचंड लाठीहल्ला केला”, असे शरद पवार यांनी सांगितले.