...तर राज्यात पुन्हा लॉकडाउन लावावा लागू शकतो; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई | Mumbai

देशभरात ७५व्या स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day 2021) आज उत्साह आहे. देशात विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करून स्वातंत्र्याला आणि आपल्या राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जात आहे. प्रथेप्रमाणे या वर्षी देखील पंतप्रधानांच्या (PM Modi) हस्ते लाल किल्ल्यावर (Lal Kila) ध्वजारोहण केलं गेलं.

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध पाळावेत नाहीतर लॉकडाऊन (Lockdown) पुन्हा लावावा लागू शकतो असा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, करोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा. नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, तरच आपण करोनाला घालवू शकतो. अजूनही करोनाचं संकट घोंघावतंय. आपण कोरोनाचा कहर अनुभवलाय. आरोग्य सुविधा आपण वाढवतोय. आता आपण शिथीलता देत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून आपण शिथिलता देत आहोत. ज्यावेळी असं लक्षात येईल, की ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यावेळी आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल, असं म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'राज्यात लसीकरणाने वेग घेतलाय. काल राज्यभरात साडे नऊ लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. हा राज्यात लसीकरणाचा उच्चांक आहे. आपण एक निश्चय करु, मी माझं राज्य, देश करोनामुक्त करणारच.'

तसेच, 'ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना माझं वंदन. महापुरुषांनी स्वराज म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय याचा अर्थ समजावून सांगितला, मला अभिमान आहे, महाराष्ट्रातील ४ पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकं मिळाली,' अशा शब्दात त्यांनी कौतुक केलं.

दरम्यान राज्यातील करोना परिस्थिती पाहता राज्यातील दुकान (Shops), मॉल (Mall) आणि उपहारागृहांना (Restaurants) ठरावीक वेळेत सुरु ठेवण्याची परवागणी देण्यात आली होती. मात्र, राज्यातील रुग्णसंख्येत घट होत असल्याने कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार, करोना प्रतिबंधक उपाययोजना करून दुकाने, मॉल आणि उपाहारगृहे आठवड्याचे सर्व दिवस रात्री दहापर्यंत खुली राहणार आहेत. करोनाच्या दीर्घकाळ र्निबधांनंतर राज्यातील व्यावसायिकांना आजपासून व्यवसायाचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com