
नागपूर | Nagpur
राज्यात महिलासंदर्भातील गुन्हे (Violance Against Women) सातत्याने नोंदवल्या जात असून महिलांवर बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात महिला-तरुणींचा विनयभंग (Molestation) आणि छेडखानीचे (Assulting) सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले असून त्या पाठोपाठ पुणे आणि नागपूर शहराचा क्रमांक आहे. त्यामुळे राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही धक्कादायक आकडेवारी महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे.
मुंबईत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांत चौपट वाढ झाली आहे. यावर्षी पहिल्या ८ महिन्यांत मुंबईत महिलांचे विनयभंग/अश्लील वर्तनाच्या १२५४ घटना नोंदवल्या गेली आहेत तर याच कालावधीत ५४९ महिला-तरुणींवर बलात्कार झाल्याच्या गुन्ह्याची नोंद मुंबई पोलिसांनी केली आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीसारख्या गुन्ह्याच्या घटनांमध्येसुद्धा दुप्पट वाढ झाली आहे.
मुंबईनंतर राज्यात पुण्यात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या असून गेल्या आठ महिन्यांत पुण्यात विनयभंग/अश्लील वर्तनाच्या ३६४ घटना घडल्या आहेत. याच काळात पुण्यात १२४ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. नागपुरातही गेल्या ८ महिन्यांत ३०४ महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत; तर १६५ महिलांवर बलात्काराच्या घटना नोंदवल्या आहेत.
शाळकरी विद्यार्थिनी टार्गेट
विनयभंग, शेरेबाजी किंवा छेडखानीच्या गुन्ह्यातील पीडितांमध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. टवाळखोर आणि टारगट युवकांचा विनयभंगाच्या आरोपींमध्ये मोठ्या संख्येने समावेश आहे.
तसेच नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांवर दाखल विनयभंगाच्या गुन्ह्याचे दाखल झाले आहेत. समाजात बदनामी होण्याची भीतीने बऱ्याच वेळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यापासून तरुणी परावृत्त होतात, अशी माहिती समोर आली आहे.