मुंबई | Mumbai
जुलै महिन्यात पावसाने (Rain) थैमान घातले होते. त्यानंतर साधारण आठवडाभर पावसाने उघडीप घेतली. आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भ (Vidarbh), मराठवाडा (Marathwada), कोकणासह (Kokan) अन्य काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे...
पुढील चार दिवस नाशिक, पुणे, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, भंडारा, सिंधुदुर्ग या भागात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. या भागांत अतिमुसळधार पाऊस (Heavy rain) पडेल तर उर्वरित भागातही मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.
11 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस असल्याचे सांगण्यात आले आहे. कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही 7-8 ऑगस्टला मुसळधारची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस पुन्हा बरसण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व आणि उत्तर पश्चिम भागात 7 ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. यामुळे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
सध्या बंगालच्या उपसागरापासून ते आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागात द्रोणीय स्थिती तयार झाली होती. त्यामुळे राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने या भागाकडून राज्याकडे बाष्प वाहू लागले आहे.
त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे. तर उर्वरित भागातही मुसळधार पाऊस पडणार आहे.