मुंबई | Mumbai
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे मान्सून अंदमान-निकोबार बेटावर दाखल झाला आहे. तौक्ते चक्रीवादळाने केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात या पश्चिम किनारपट्टीलगतच्या राज्यांना जोरदार तडाखा दिला. याच दरम्यान मॉन्सूनला अनुकूल असे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील २ ते ३ दिवसांत मध्य महाराष्ट्रासह घाट भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी आणि मंगळवारी पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रात पाऊस बरसत असताना विदर्भ, मराठवाड्यात मात्र कोरडे वातावरण असण्याचा अंदाज आहे. खरंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनचं महाराष्ट्रातील हवामानात विविध बदल नोंदले गेले आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. १ जून रोजी केरळ तर १० जून रोजी महाराष्ट्रातील तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर १०-२० जून दरम्यान मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अंदमानात मान्सून दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याने केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सून वेळेवर हजेरी लावेल, अशी अपेक्षा आहे.