वेळ पडल्यास जेलभरो आंदोलन करू

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचा इशारा
वेळ पडल्यास जेलभरो आंदोलन करू

पुणे(प्रतिनिधी)

यावर्षी ३१ डिसेंबरला एल्गार परिषदेला परवानगी दिली नसली तरी ३० जानेवारी रोजी ही परिषद गणेश कला क्रीडा मंच येथे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, तेथे आम्हाला परवानगी मिळाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून ही परिषद घेऊ आणि वेळ पडल्यास जेलभरो आंदोलन करू असा इशारा माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा दिन आणि लोकशाही आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सिद्धार्थ दिवे, सागर आल्हाट, गणपत भिसे, आकाश साबळे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर एल्गार परिषद घेण्यासाठी पोलिसांनी कोरोनाचे कारण देत परवानगी नाकारली त्या पाश्वभूमीवर ही पत्रकार आयोजित करण्यात आली होती.

दरम्यान, ब्राह्मण्यवाद आणि भांडवलशाही हे आमचे दोन प्रमुख शत्रू असून अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे आणि यासाठी राजकारण झाले पाहिजे एवढेच आमचे म्हणणे आहे असे कोळसे पाटील म्हणाले. एल्गार परिषदेला विनाकारण बदनाम करण्यात आले असून परिषदेला परवानगी नाकारल्यास रस्त्यावर घेऊ, असा इशारा माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

भीमा कोरेगाव दंगलीचा आणि एल्गार परिषदेचा काहीही संबंध नसताना आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, एल्गार परिषदेसंदर्भात ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाहीये, आम्ही कोणाकडून आर्थिक मदतीही घेतली नाही, दोन वर्ष उलटूनही तपास होत नाही, तपास लवकर करावा या मागणीसाठी सुप्रिम कोर्टावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही कोळसे पाटील यांनी यावेळी दिला.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्यात माझा मोठा वाटा आहे, तो कोणी मान्य करणार नाही, देवेंद्र फडणवीस सरकारने सुरक्षा दिली आणि महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच दिवशी काढून घेतली. मी एवढा कमकुवत नाही की सुरक्षा द्या म्हणून मागणी करेन, मी कोणालाही घाबरणार नाही असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवरही टिका केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com