
नागपूर | Nagpur
मध्यरात्रीपासून नागपुरात (Nagpur) विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपुरात एका रात्रीत १०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून येथील नागनदीला (Nagriver) पूर आला आहे. तर नागनदी काठच्या घरांमध्ये (Houses) पुराचे पाणी शिरल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे....
हवामान विभागाने (Meteorological Department) शुक्रवारी विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला असून काल दिवसभर नागपूरमध्ये पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळच्या वेळी या पावसाची तीव्रता अधिक वाढल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. तर नागलवाडी, अंबाझरी कार्पोरेशन कॉलनी, संजीव हजारी, सेपू अपार्टमेंट, अतकरी, माणके पाटील, रमेश विलोनकर, पांडुरंग आणि हाडकर, नवनाथ बागवाले आणि सत्यसाई सोसायटीतील अनेक घरात पाणी शिरले आहे. तसेच येथे अजूनही पावसाची रिपरिप सुरू आहे.
तर दुसरीकडे नागपुरातील मुसळधार पावसाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी एक ट्वीट केले आहे. फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या ४ तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या २ चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत," असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नागपूर शहरांमध्ये (Nagpur City) रात्री २ वाजेपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला असून जिल्हा आणि महानगर प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यरत आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी शहरातील अनेक भागांची पाहणी केली आहे. शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे. तर जिल्ह्यातील सर्व शाळांना (जिल्हा आणि महानगर क्षेत्र) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे.