
पुणे | Pune
येथे एका लग्नात गुलाबजामवरून तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. लग्नात उरलेले गुलाबजाम घरी घेऊन जाण्यावरून केटरर्स व्यवस्थापक आणि नातेवाईकांमध्ये राडा झाला. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
पुण्यातील हडपसरच्या शेवाळेवाडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी हाणामारीत जखमी झालेल्या मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक दिपांशु गुप्ता (26, रा. राजयोग मंगल कार्यालय, शेवाळेवाडी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडे आणि कांबळे परिवारांचा विवाह सोहळा शेवाळेवाडी येथील राजयोग मंगल कार्यालयात होता. लग्नसोहळ्यातील केटरिंगचे काम गुप्ता यांच्याकडे होते. वर पक्षाकडील व्यक्तीने राहिलेले जेवण सोबत घेऊन जायचे असल्याचे केटरिंगचे व्यपस्थापकाला सांगितले.
त्यावेळी दिपांशु गुप्ता यांनी तुम्ही जेवण घेऊन जाऊ शकता काही हरकत नाही असे सांगितले. गुप्ता यांनी हरकत नसल्याचे सांगितल्यावर वर पक्षातील त्या व्यक्तीने नातेवाइकांसह राहिलेले जेवण डब्यात भरण्यास सुरुवात केली.
त्यावेळी एक जण डब्यामध्ये तिथे असलेले गुलाबजाम भरू लागला. मात्र त्यावेळी गुप्ता यांनी त्यास विरोध केला.'हे गुलाबजाम तुमचे नाहीत. उद्याच्या लग्नाच्या जेवणासाठी तयार केलेले आहेत. त्यामुळे ते घेऊन जाऊ नका,' असे गुप्ता यांनी सांगितले.
यावरुनच गुप्ता यांचा वर पक्षातील लोकांसोबत वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. वर पक्षाकडील लोकांनी शाब्दिक वाद वाढवून तिघांनी गुप्ताला मारहाण केली. तसेच गुप्ता यांना लोखंडी झारा मारून जखमी केले. त्यानंतर मारहाण करणाऱ्यांनी तिथून पळ काढला.
दिपांशु गुप्ता यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर हडपसर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.