मुंबई | Mumbai
भरधाव कारने ट्रकला मागून धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर घडली आहे.
सकाळी ७ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात इतका भयानक होता की, यात गाडीचाही चक्काचूर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार क्र. (MH 04 JM 5349) ही आढे गावाजवळील किमी 82 जवळ भरधाव वेगात आली. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोर जाणारा ट्रक क्र. (RJ 09 JB 3638) ला या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.
ही धडक एवढी जोरदार होती की कार टँकर ट्रकच्या मागे रुतून बसली. या अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तीन मृतांपैकी एकाची ओळख पटली असून, त्यांचं नाव विजय विश्वनाथ खैर आहे. ते सातारा जिल्ह्यातील असून, इतर दोघांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे.
पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत.