एप्रिलमध्ये आठ हजार बेरोजगारांना रोजगार

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
एप्रिलमध्ये आठ हजार बेरोजगारांना रोजगार

मुंबई । प्रतिनिधी

करोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात एप्रिल महिन्याच्या ८ हजार २५९ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. तर चालू वर्षात जानेवारी ते एप्रिलअखेर ५२ हजार १६९ बेरोजगारांना रोजगार उपलब्ध देण्यात आल्याची माहिती मलिक यांनी दिली.

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय साधंण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे.

या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com