<p><strong>मुंबई -</strong> </p><p>थकीत वीजबिल वसूलीसाठी वीज विभाग राज्यातील शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांवर कारवाई करत आहे. याच्या निषेधार्थ </p>.<p>येत्या 24 फेब्रवारीला भाजपाकडून राज्यभरात 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत एवढं तीव्र आंदोलन झालं नसेल, तेवढं तीव्र आंदोलन केलं जाणार आहे, असे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकारपरिषदेत म्हटले आहे. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी देखील उपस्थित होते.</p><p>महाराष्ट्रात वीज विभागाकडून संपूर्ण राज्यात शेतकर्यांची व घरगुती वीज तोडणे आणि ते देखील दमदाटी करून, पोलिसांच्या बळाचा वापर करून. महाराष्ट्रात यापूर्वी या पद्धतीने कधीही या मोगलशाही पद्धतीने कारभार केला गेला नाही, मात्र असं काम मागील आठ ते पंधरा दिवसांपासून वीज खात्याकडून सुरू झालं आहे असं यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.</p><p>राज्यात भाजपा जेव्हा सत्तेत होती तेव्हा 45 लाख शेतकर्यांचे 28 हजार कोटी थकीत झाल्यावरही एकाही शेतकर्याच वीज कनेक्शन आम्ही कापलं नाही. पण या सरकराने शेतकर्यांची वीज कनेक्शन कापणं सुरू केलं आहे. आज पिकांना पाण्याची गरज असताना संपूर्ण राज्यात वीज तोडणी करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या मोगलशाही कारभारामुळे शेतकरी आत्महत्याकडे वळतील अशी कृती महाराष्ट्र सरकारकडून सुरू आहे. राज्यातील तीन कोटी लोकांना अंधारात आणण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहे. या सरकारला आज आम्ही शेवटची विनंती करतो आहे असा इशारा देखील बावनकुळे यांनी दिला आहे.</p>