मुंबई - तोक्ते चक्रीवादळाच्या परिसरात मुंबईपासून भर समुद्रात 175 किमी दूर मुंबई हाय फील्डवर 273 कर्मचारी अडकले आहेत. हीरा तेल विहीरीच्या जवळ असलेल्या एका बार्जमध्ये हे सारे अडकले असून सर्वांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांची सुटका करण्यासाठी नौदलाने दोन लढाऊ युद्धनौका आयएनएस तलवार आणि आयएनएस कोच्ची पाठवल्या आहेत.
या युद्धनौका सायंकाळपर्यंत त्या कर्मचार्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तसेच आपत्कालीन मदतीसाठी नौदलाने अन्य जहाजे आणि विमानांनाही तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. चक्रीवादळाच्या परिसरात अडकलेल्या या कर्मचार्यांना बचावासाठी आणि शोधासाठी लवकरात लवकर मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांची सुखरुप सुटका करण्यासाठी वेगवान वारे आणि अजस्त्र लाटांच्या मध्ये नौदलाने बचाव कार्य सुरु केले आहे.
दरम्यान, तोक्ते चक्रीवादळामुळे हाहाकार उडाला असून या वादळाचा जोरदार तडाखा कोकण किनारपट्टीसह मुंबईला बसला आहे. अनेक भागात सकाळपासून वीजपूरवठा खंडीत झाला आहे.