
पैठण (प्रतिनिधी)
खोटं लग्न लावुन नवरदेवाला व त्यांच्या कुटुंबाला लुटणाच्या टोळीला पोलिसांनी अटक केल्याने, एका तरुणाची होणारी मोठी फसवणूक टळली आहे.
आंबादास नवनाथ नागरे (रा. दहेगाव ता. शेवगाव जि.अ.नगर ह.मु.नारळा, पैठण ता. पैठण), राजु अंकुश चाबुकस्वार, (वय 39 वर्षे रा. चन्नापुरी ता. अंबड जि.जालना), उमेश गणेश गिरी ( वय 22 वर्षे रा. तिर्थापुरी ता. घनसांवगी जि. जालना), शिला मनोहर बनकर (वय 35 वर्षे रा. एकतुनी ता.पैठण जि.औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.
पैठण परीसरात खोट्या लग्नाच्या वाढत्या घटना पाहता, पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया,अप्पर पो.अधिक्षक लाझेंवार.उपविभागीय पो.अधिकारी डाॅ,विशाल नेहुल.यांनी स्थानिक पोलिसांना टोळीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. पैठण पोलिसांकडून या टोळीचा शोध घेतला जात होता. दरम्यान नाथ मंदिर पार्किंग परीसरात काही संशयीत व्यक्ती लग्नाचा बनाव करत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली.
त्यामुळे पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस पथकातील पो.उपनिरीक्षक संजय मदने, मनोज वैद्य,सुधिर ओव्हळ, सचिन आगलावे, गोपाल पाटील घटनास्थळी धाव घेत वधु व वराच्या वेषात असलेल्या व्यक्तींची विचारपुस केली. मात्र यावेळी वधु पक्षाकडील व्यक्तींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोन्ही पक्षातील लोकांना पोलीस ठाण्यात आणल्यावर पोलिसांनी सखोल चौकशी केली.
त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश गणेश मोरे (वय 24 वर्षे रा. टाकेशिवणी ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा) या युवकाचे लग्न जुळत नव्हते. दरम्यान आंबादास नागरे याने प्रकाशच्या वडिलांना माझ्या परिचयाची एक मुलगी असुन, तिला आई वडील नाही व एक भाऊ आहे. ती मुलगी परिस्थीने गरीब आहे. तसेच तुमच्या मुलाचे तिच्यासोबत लग्न लावुन देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्या मोबदल्यात दीड लाख द्यावे लागतील असे सांगितले.
दागिन्यांसह केली लाखोंची खरेदी
मुलाला मुली मिळत नसल्याने मुलाच्या वडिलांनी या मुलीसोबत लग्न करण्यास मध्यस नागरेला होकार दिला. त्यानुसार नागरे याने मुलाकडच्या कुटुंबातील सदस्यांना मुलगी पाहण्यासाठी पैठण येथे बोलावुन, लग्नाची तयारी करण्यासाठी सोन्याचांदीचे दागीने व कपडे असे एकुन 18 हजार 758 रुपयांचे खरेदी करण्यास भाग पाडले. पण लग्न खोटे होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि बनावट नवरीसह टोळीला पोलिसांनी अटक केली.
जातही खोटी सांगितली
राज्यात खोटे लग्न लाऊन नवरीसाठी मिळालेले स्त्री धन, दागिने आणि मोल्यावन वस्तू घेऊन पसार होण्याच्या घटना वाढल्या आहेत. असाच काहीसा प्रकार पैठण येथे घडणार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपी हे वेगवेगळ्या जातीधर्माचे आहेत. मात्र त्यांनी मुलाच्या वडीलांना वधु ही त्याच्या जाती व धर्माची असल्याचं सांगितलं. आपल्याच जातीची मुलगी असल्याने मुलाच्या वडिलांनी लग्नासाठी लगेच होकार दिला. पुढे याचा फायदा घेत नागरेसह त्याच्या साथीदारांनी स्वतःचा आर्थीक लाभ मिळवण्यासाठी बनावट लग्नाची तयारी करत फसवणुक केली. या टोळीने औरंगाबाद, जालना, अहमदनगर येथे तसेच परराज्यात देखील यापुर्वी याप्रकारचे बनावट लग्न केले असल्याचा संशय पोलिसांना असून, त्यानुसार तपास करण्यात येत असल्याची माहिती उपविभागी पो.अधिकारी डाॅ.विशाल नेहुल यांनी प्रसिध्दी माद्यमांना दिली आहे.