मनोज जरांगेंच्या भाषणावेळी तरुणाचा स्टेजवर गोंधळ
पुणे | Pune
मराठा आरक्षणासाठी आक्रमक लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांच्या सध्या राज्यभरात विविध भागामध्ये सभा होत आहेत. आरक्षणासाठी सरकारला २८ ऑक्टोंबरपर्यंतची मुदत दिल्यानंतर जरांगे पाटील राज्यभर दौरे करत आहेत. आज (शुक्रवार, २० ऑक्टोंबर) पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये त्यांची सभा होत असून या विराटसभेतून जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, या सभेवेळी मनोज जरांगे यांनी जमलेल्या गर्दीला संबोधित केलं सरतेशेवटी मंचावर काल आत्महत्या केलेल्या कावळे यांना श्रध्दाजंली देण्यासाठी सर्वजण उभे असतानाच अचानक एका आंदोलकाने मंचावर भाषण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सभेमध्ये गोंधळ झाल्याचे दिसून आले. या तरूणाने मंचावर जाऊन भाषण करण्याचा आणि घोषणा देण्याचा प्रयत्न केला.
नेमकं काय घडलं?
जरांगे यांच्या भाषणावेळी अचानक एक तरुण स्टेजवर आला. हा तरुण माईक हातात घेऊन आल्यानंतर मला बोलू द्या म्हणू लागला. मला बोलू दिले नाही तर आत्महत्या करेल, अशी धमकी देखील तरुणाने दिली. स्टेजवरील उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याची समजूत काढत बाजूला नेले. त्यानंतर स्टेजवर तरुण आणि जरांगे पाटील यांचा संवाद झाला. खुद्द जरांगे यांनीही त्या तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मनोज जरांगे भाषणात काय म्हणाले?
आजच्या पुण्यातील सभेत जरांगे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या मराठा आंदोलकांच्या आत्महत्यांना फक्त सरकारच जबाबदार आहे. सरकारने वेळेत आरक्षण दिले असतं तर या आत्महत्या झाल्या नसत्या, असंही जरांगे म्हणाले. या सरकारने २४ तारखेपंर्यत कोणालाच काही बोलायचे नाही, असे ठरवले आहे. मराठ्यांना मराठ्यांच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता शांत राहायचं. २४ तारखेपर्यंत कोणालाच उत्तर द्यायचं नाही. मराठा आरक्षणावरून वातावरण दूषित करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.