मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील करोना संकट कायम आहे. राज्यात करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
राज्यातील वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी महाराष्ट्रातील जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहे.
राज्यातील वाढता करोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन, करोना लसीकरण या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. तसेच भविष्यातील राज्याची दिशा कशी असेल?, अर्थव्यवस्थेला चालना कशी देणार? यावर मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्री आज नेमकं काय बोलणार याकडे राज्यातील सर्व जनतेचे लक्ष लागून आहे.
दरम्यान राज्यात काल ६६ हजार १५९ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ४५ लाख ३९ हजार ५५३ झाली आहे. काल ७७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ९८५ झाली असून मृत्यूदर १.५ टक्के झाला आहे. काल ६८ हजार ५३७ रुग्ण या करोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३७ लाख ९९ हजार २६६ रुग्ण, करोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यभरात सहा लाख ७० हजार ३०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.