बेळगाव | Belgaum - बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा हटवलेला पुतळा आठ दिवसात सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुन कर्नाटक सरकार पुन्हा बसवणार आहे. Chhatrapati Shivaji Maharaj
शिवरायांचा पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटवल्यानंतर तणाव निर्माण झाला होता, या घटनेमुळे राज्यातील शिवभक्तांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती, संतप्त शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात आंदोलनं केली. अनेकांनी मुख्यमंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळे दहन केले, सीमाभागातील कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
छत्रपतींचा पुतळा हटवल्यामुळे मनगुत्ती गावात तणावाचं वातावरण होतं, याठिकाणी मराठी बांधव रस्त्यावर उतरला होता, या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती. सकाळी अतिरिक्त पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी आणि हुक्केरी तहसीलदार व गावातील पंचाची बैठक झाली या बैठकीत आगामी आठ दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवण्याचा निर्णय झाला आहे. आठ दिवसात सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापणा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पुतळा बसवेपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांची घेतली होती. बेळगावातून श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, युवा कार्यकर्ते गौरांग गेंजी, सांगलीतील बेळगाव मधील शिव प्रेमी युवक यावेळी उपस्थित होते. एकमेकांच्या सहमतीने आठ दिवसात तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 5 ऑगस्ट रोजी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. गावातील एका गटाचा त्याला विरोध होता. ग्रामपंचायतीने परवानगी दिली होती. पण शुक्रवारी रातोरात हा पुतळा हटवण्यात आल्याने गावकर्यांनी आक्रमक भूमिका घेतली. दुपारनंतर बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी देखील मनगुत्ती गावाला भेट देऊन पाहणी केली.