
मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आज बीड जिल्ह्याच्या (Beed District) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मराठा आंदोलनावेळी जाळपोळ झालेल्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत नेतेमंडळींच्या घरे आणि कार्यालयांची जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांवर सडकून टीका केली. तसेच तेली आणि माळी समाजाचे नेते आहेत, ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यामुळे तुम्ही त्यांचे घरे आणि कार्यालये जाळली का? असा सवाल करत छगन भुजबळ यांनी पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले. तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावरही टीकास्त्र सोडले...
यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, "मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) मी किंवा माझ्या पक्षाने तसेच समता परिषदेने कधीही विरोध केलेला नाही. पण आम्ही पहिल्यापासून हे निश्चितपणे म्हणालो आहोत की मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये. वेगळं आरक्षण त्यांना द्या, सर्वोच्च न्यायालयात ज्या त्रुटी असतील त्या दूर करा आणि मराठा बांधवाना आरक्षण द्या. ओबीसीमध्ये अतिशय लहान लहान जाती आहेत. धनगर, वंजारी, कुणबी, माळी, तेली, सुतार, लोहार, कुंभार असे अनेक लोक त्यात आहे. त्यामुळे ओबीसींमधून (OBC) आरक्षण दिले तर कुणाचाच फायदा होणार नाही", असे भुजबळ यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, "जरांगे यांच्या उपोषणावेळी लाठीचार्ज झाला. त्यामध्ये पोलीस (Police) जखमी झाले त्यांची बाजू पुढे आले नाही. ७० पोलीस जखमी झाल्यावर काय करणार? त्यांच्या आमच्या सरकारने बदल्या केल्या. पोलिसांवर कारवाई झाली म्हणून काय व्हायचे तर होऊ द्या हे त्यांनी ठरवले असावे. पोलिसांवर हल्ला झाला त्याची कडक चौकशी झाली पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण (Hunger Strike) सोडायला माजी न्यायमूर्ती जात असतील तर आम्हाला काय न्याय मिळणार? मंत्री जातात ते ठीक पण न्यायमूर्ती त्यांना सर म्हणतात, त्यांच्या पाया पडतात? असेही भुजबळ यांनी सांगितले.
भुजबळ पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी आयोग नेमला जावा आणि त्यांना आरक्षण दिले जावे. जी आमची भूमिका आहे ती भूमिका सर्व पक्षीयांची आहे. सर्वपक्षीय बैठक झाली त्यातही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे यावर सगळ्यांचे एकमत झाले आहे. मात्र मला एक समजले नाही अचानक आंदोलन सुरु करण्यात आले त्यात प्रचंड नासधूस करण्यात आली. त्यात कुणी सापडले असते तर त्यांना ठार मारण्यात आले असते. तसेच आमदार प्रकाश सोळंकेच्या घरात मोठमोठे दगड फेकण्यात आले. कोयते, विळे हेदेखील फेकले गेले. जयदत्त क्षीरसागर यांचे ऑफिस बेचिराख करण्यात आले. संदीप क्षीरसागर यांच्या घरीही हाच प्रकार घडला. तिथल्या मुलांना भिंतीवरुन उड्या टाकून बाहेर पडावे लागले. आगीत ती मुले सापडली असती तर ती मुले मेली असती. नासधूस करण्यासाठी सांकेतिक क्रमांक दिले गेले होते. जी काही जाळपोळ झाली ती पूर्वनियोजित कट रचून झाली असेही त्यांनी म्हटले.
तसेच जरांगेंवर टीका करतांना भुजबळ म्हणाले की, वातावरण शांत व्हावं म्हणून आमचे काही मंत्री जरांगेंच्या भेटीसाठी जात आहेत. परंतु, जरांगे थांबायचे नाव घेत नाहीत. त्यांना सरसकट आरक्षण पाहिजे. तिकडे तेलंगणामध्ये निवडणुका सुरु आहेत म्हणून समितीला नोंदी तपासता येत नव्हत्या. मात्र, जरांगे अडून बसले होते.आता कुणबी प्रमाणपत्र वाटण्यासाठी दुकाने सुरु झाली आहेत. ज्या जालन्याच्या मैदानातून शरद पवारांनी आरक्षणाची घोषणा केली होती. त्याच जालन्यातून आरक्षण संपवण्याचे काम होत आहे. सध्या राज्यात दहशत पसरवण्याचे काम सुरु असून आमदारांची घरे जाळली जात आहेत. तरीही मंत्री, आमदार जरांगेंना भेटत आहेत. मग या लोकांना ओबीसींची मते नको आहेत का?" असा प्रश्नही छगन भुजबळांनी उपस्थित केला.