मुंबई l Mumbai
राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मुंबई, ठाण्यात गेल्या 24 तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला तर पश्चिम उपनगरात भाईंदर आणि मीरा रोड भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पण आता पुढच्या 24 तासांत मुंबई आणि शहरालगतच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
सोमवारी मंगळवारी मुंबई ठाणे आणि कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. राज्यातल्या काही भागात हवामान खात्याने पावसाचा पुन्हा एकदा अलर्ट दिला आहे. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि बीड इथे मेघगर्जनेसह पुढच्या 24 तासांमध्ये दमदार पाऊस होईल असा इशारा वेधशाळेने दिला आहे.
राज्यातल्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे राज्यातल्या अनेक नद्यांना पूर आला आहे. काही भागात तर काही तासांमध्येच प्रचंड पाऊस झाल्याने रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं. तर गडचिरोलीमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला होता. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे अशी शक्यती व्यक्त केली जात आहे.