
मुंबई | Mumbai
राज्यात मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच पेटले असून मराठा आंदोलकांकडून (Maratha Protestors) राजकीय नेत्यांची घरं आणि कार्यालये पेटवून देण्यात येत आहेत. त्यामुळे या आंदोलनाचा फटका आता एसटी महामंडळाला (ST Bus) देखील बसल्याचे पाहायला मिळत असून ठिकठिकाणी बसची तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. यामुळे महामंडळाकडून अनेक ठिकाणी बससेवा बंद करण्यात आली आहे. अचानक बससेवा ठप्प झाल्याने ऐन दिवाळीच्या (Diwali) तोंडावर प्रवाशांचे हाल होत आहेत...
मराठा आंदोलनाचे नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगरसह विविध जिल्ह्यांत तीव्र पडसाद उमटत असून एसटी महामंडळाकडून खबरदारी म्हणून या जिल्ह्यांमधील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने नाशिकहून (Nashik) मराठवाड्याकडे जाणाऱ्या बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अनेक जिल्ह्यात जाणाऱ्या बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय शहरातील स्मार्ट सिटी बस सेवा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar District) धावणाऱ्या अनेक एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे एसटी महामंडळाला ५ लाखांचा फटका बसल्याचे बोलले जात आहे. तसेच अकोला (Akola) येथून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, पुणे, नांदेड, बीड, पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत.
तसेच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथून नाशिकला जाणाऱ्या बसच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खासगी बस, रेल्वे किंवा खाजगी वाहतुकीचा प्रवाशांना आधार घ्यावा लागत आहे. तर बीडमध्ये देखील मराठा आंदोलक आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी बसची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याने याठिकाणची बससेवा बंद करण्यात आली आहे. याशिवाय सोलापूर डेपोतून धावणाऱ्या लालपरीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुण्यातून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सोलापूर येथे जाणाऱ्या लालपरीच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत.