
मुंबई | Mumbai
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत येत्या २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान, दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा (SSC-HSC Exam) घेतल्या जाणार आहे. मात्र, त्याआधीच बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे....
या निर्णयानुसार उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना (Students) परीक्षा केंद्रांवर (Examination Centre) प्रवेश देऊ नये, असे आदेश केंद्रांना देण्यात आले आहे. याआधी अपवादात्मक परिस्थितीत १० मिनिटे उशीर झाल्यानंतरदेखील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता. मात्र, आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात यावा, असे आदेश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत.
त्यामुळे परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपरला मुकावे लागू शकते. 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणारी दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता होणार आहे.
परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे, अनिवार्य असणार आहे. या संदर्भातील पत्रदेखील मंडळाकडून सर्व शाळांना पाठवण्यात आले आहेत.
उशीरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.