
मुंबई | Mumbai
मुंबई महापालिकेच्या प्रभागांच्या संख्येवरून निर्माण झालेल्या वादावर आज अखेर उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील शुकरे, न्या. एम. डब्ल्यू. चंदवाणी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. याचिकेत काही तथ्य नसल्याची टिप्पणीही खंडपीठानं केली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मिळाला असून मुंबई महापालिकेतील प्रभागसंख्या २२७ राहणार असणार आहे.
मविआ सरकारनं मुंबई महापालिकेतील २२७ वॉर्ड संख्या वाढवून २३६ करण्यात आली होती. हा नियम फक्त मुंबई महापालिकेसाठीच होता. कारण या महापालिकेसाठी वेगळा कायदा आहे. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं ही रचना बदलून पूर्वीचीच २२७ वॉर्ड संख्या कायम ठेवली होती.
या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे राजू पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. बीएमसी प्रभाग संख्या आणि पुनर्रचनेसंदर्भातील सुनावणी १८ जानेवारीला पूर्ण झाली होती. मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय राखून ठेवला होता.
याचिकेला वर्तमान राज्य सरकारचा जोरदार विरोध होता आणि त्यांनी याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर आम्ही कुठल्याही अधिसूचनेला नाही, तर कायद्याला बांधिल असल्याचं राज्य निवडणूक आयोगाने म्हटलं होतं.