औरंगाबादेत आता मृत्युदर रोखण्याचे आव्हान

पंधरा दिवसांत 418 जणांचा मृत्यू
औरंगाबादेत आता मृत्युदर रोखण्याचे आव्हान

औरंगाबाद - Aurangabad :

करोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या लाटेत मृत्युदराचे प्रमाणही अधिक दिसून येत आहे.

मागील पंधरा दिवसांतच जिल्ह्यात एकूण 418 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील मृतांचे प्रमाण कमी असून ग्रामीण भागातील मृतांची संख्या ही अधिक आहे. त्यामुळे मृत्युदरास रोखण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेने देशभरात थैमान घातले आहे. मागील 24 तासांतच देशभरात चार हजारांपेक्षा अधिक करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्‍त केली जात आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेतच वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशभरात सरकारी आरोग्य यंत्रणेची दमछाक झाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर आता कोरोनाची जुलैनंतर येणारी तिसरी लाट अधिकच घातक असल्याचे भाकीत आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.

त्यामुळे या दुसर्‍या लाटेत कोरोनाच्या मृत्युदराचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे क्रमप्राप्‍त झाले आहे. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोनाग्रस्तांचे होणारे मृत्यू ही चिंताजनक बाब बनली आहे.

फेब्रुवारी महिन्यात दुसर्‍या लाटेने शिरकाव केला. पुढे मार्च व एप्रिलमध्ये या लाटेने रौद्र रूप धारण केले होते. मात्र प्रशासकीय यंत्रणेनेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे मे महिन्याच्या सुरूवातीपासून आजपर्यंत मागील पंधरा दिवसांत रोजचा बाधितांचा आकडा कमी होताना दिसत आहे.

मात्र यात मृत्युदराचे प्रमाण हे कायम असून त्यास रोखण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे आहे. 1 ते 15 मे दरम्यानच्या पंधरा दिवसांतच जिल्ह्यात तब्बल 392 जणांचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील 134 मृतांचा समावेश असून ग्रामीण भागातील 358 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com