अहमदनगर (प्रतिनिधी) -
आदर्श गाव हिवरेबाजार ग्रामपंचायतसाठी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (बुधवारी ) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
.
ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सध्या सुरू असून अखेरच्या दिवशी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नगर तालुक्यातील 59 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (बुधवारी) अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची एकच झुंबड उडाली.
ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आधी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येणार्या अडचणीमुळे तसेच अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढीची मागणी केल्याने निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी साडेपाच वाजेपर्यंत मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला. गावची सत्ता काबीज करण्यासाठी राजकारण्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.
लोकशाहीचा पाया ग्रामपंचायत
लोकशाहीचा पाया ग्रामपंचायत आहे. आमदार, खासदार निधी, सरकारच्या योजना या सक्षम पंचायतींच्या माध्यमातूनच गावात येतात. गावची पंचायत सक्षम असेल तर गाव सक्षम होते. गावची पंचायतच सर्वांच्या समन्वयातून गावचा चेहरा बदलू शकते, असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.