
मुंबई | Mumbai
नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच आता नागपुरातील मेडिकल-मेयो (Nagpur Medical Hospital) या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतही २४ तासांत २५ मृत्यू (25 Patients Death In 24 Hour) झाल्याचे समोर आले आहे.
मागील २४ तासांत ८ जणांना खासगी रुगणालयातून मेडिकलमध्य रेफर केले. यानंतर काही तासांतच हे रुग्ण मेडिकलमध्ये दगावले. यामुळे मेडिकल-मेयोमधील मृत्यूचा टक्का आपोआपच वाढतो. २४ तासांमध्ये मेडिकल आणि मेयोत २५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.
२५ पैकी १२ रुग्ण हे शेवटच्या क्षणाला खाजगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ८ ते इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात चार रुग्ण आले. खाजगी रुग्णालय रुग्णाची स्थित बघून अॅडमिट करून घेतात तर शासकीय रुग्णालयात सर्वांनाच अॅडमिट करून घ्यावे लागते त्यामुळे मृत्यूचे हे मोठे आकडे दिसत असल्याचे रुग्णालयात प्रशासनाचे म्हणणे आहे.
नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यापूर्वी ऑगस्टमध्ये ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २४ तांसात २३ मृत्यू झाले होते. या पार्श्वभूमीवर नागपुरातील मेडिकल- मेयोतील मृत्यूची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मेडिकल आणि मेयोत विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलांगणा या राज्यातील अत्यवस्थ रुग्णांचा भार आहे. या रुग्णांसाठी मेडिकलला अधिकृत १ हजार ४०१ तर ट्रॉमा आणि अतिरिक्त मिळून एकूण १ हजार ८०० खाटा आहेत.
दोन्ही रुग्णालयांत रोज सुमारे दीड हजार रुग्ण दाखल होऊन उपचार घेतात. दरम्यान, मेडिकलमध्ये २ ऑक्टोबरला २४ तासांत तब्बल १६ आणि मेयो रुग्णालयात ९ रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला. हे रुग्ण वेगवेगळ्या वयोगटातील आहेत. मेडिकलला दगावलेल्या एकूण रुग्णांपैकी ८ रुग्ण हे खासगी रुग्णालयांतून अत्यवस्थ अवस्थेत या ठिकाणी आले होते.
या रुग्णांना मेडिकलच्या डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात हलवले. परंतु २४ तासांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. मेयोतही हीच स्थिती होती. त्यामुळे खासगी रुग्णालये त्यांच्याकडचे मृत्यू कमी दाखवण्यासाठी शेवटच्या क्षणी त्यांना मेडिकल-मेयोत हलवत असल्याचे निरीक्षण येथील काही डॉक्टरांनी सांगितले.
राज्याची आरोग्य व्यवस्था चिंतेचा विषय
राज्याची आरोग्य व्यवस्था सद्या चिंतेचा विषय ठरत आहे त्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. ठाण्याच्या कळवा रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडवाला जबाबदार कोण याचा अहवाल अजूनही आलेला नाही तोच नांदेड आणि औरंगाबादमध्ये आणखी काही रुग्णांना जीव गमवावा लागलाय. सरकारी रुग्णालयांची दुरवस्था आणि प्रशासनाची अनास्था पुन्हा एकदा उघडी पडली आहे.