मुंबई | Mumbai
राज्यातून बेपत्ता होणाऱ्या मुलींचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. मार्च महिन्यात राज्यातून तब्बल २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्यातून १८ २५ वयाच्या सरासरी ७० मुली रोज बेपत्ता होतायत. ही आकडेवारी निश्चितच सर्वांची चिंता वाढवणारी आहे. यातून यंत्रणांबाबतही अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात चाललंय काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
एकीकडे राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना दुसरीकडे राज्यात मुली बेपत्ता होण्याचं प्रमाणही वाढलंय. एकट्या मार्च महिन्यात राज्यातून तब्बल २२०० मुली बेपत्ता झाल्यायेत. फेब्रुवारी महिन्यापेक्षा ही आकडेवारी ३०७ ने जास्त आहे. विशेष म्हणजे बेपत्ता होणाऱ्या मुलींमध्ये १८ ते २५ वयोगटातील मुलींचं प्रमाण सर्वाधिक आहे, या वयोगटातील दररोज ७० मुली बेपत्ता होतायेत. त्यामुळे पालकवर्गाची चिंता वाढलीय.
यंदाच्या वर्षी जानेवारीत १६०० मुली बेपत्ता असल्याची नोंद झाली तर फेब्रुवारी महिन्यात हा आकडा १ हजार ८१० इतका होता. अनेक तरुणींना वेश्याव्यवसायात ढकललं जातय. तर घर सोडून जाणाऱ्या मुलींचं प्रमाणही अधिक आहे. विशेष म्हणजे २०२२ च्या मार्च महिन्यातील आकडेवारी पाहिली तर पोलीस रेकॉर्डवरील १६९५ मुलींचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. मग या मुलींचं काय झालं ? एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होत असल्याच्या नोंदी असतानाही पोलीस प्रशासन त्यांचा शोध का घेऊ शकलेलं नाही हा देखील निश्चितच संशोधनाचा विषय आहे.
नगर जिल्ह्यात १०१ मुली गायब!
मार्चमध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास २२०० मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे.. बेपत्ता तरुणींची जिल्हानिहाय आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक नोंद पुणे जिल्ह्यात आहे. तिथं २२८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्याखालोखाल नाशिकमध्ये १६१, कोल्हापुरात ११४, ठाण्यात १३३, अहमदनगरमध्ये १०१, जळगावात ८१, सांगलीत ८२ तर यवतमाळमध्ये ७४ मुली बेपत्ता झाल्या आहेत.
अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवणं, लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेणं, मुलींना वाईट मार्गाला लावणं, नोकरीचं आमिष दाखवून शोषण करणं अशा घटनांमुळे महिलांच्या, तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनलाय.