छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar
दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षेचा (10th, 12th Board Exams) निकाल (result) दृष्टिक्षेपात येत असतानाच या परीक्षेतील गैरप्रकाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत अक्षरबदल आढळून आल्याने शेकडो विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयाने पाचारण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ३२० विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये अक्षरबदल आढळून आला असून, दररोज ८० विद्यार्थ्यांची बोर्डात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी चार दिवस चालणार आहे.
बोर्डाने पहिल्या दिवशी पाचारण केलेले विद्यार्थी हे अंबाजोगाई येथील योगेश्वरी व तेथीलच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे असल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांची वर्ग -२ च्या अधिकार्यांसमोर ही सुनावणी होत आहे. पहिल्याच दिवशी ८७ विद्यार्थी बोर्डात दाखल झाले आहेत. या विद्यार्थ्यांसोबतच पालकही आल्याने विभागीय कार्यालयात आज गर्दी आढळून आली. सुनावणीसाठी आलेल्या काही विद्यार्थी व पालकांशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, विभागीय बोर्डाचे अचानक महाविद्यालयाला पत्र आले. त्यात संबंधित विद्यार्थ्यांच्या भौतिकशास्त्र (फिजिक्स) विषयाच्या उत्तरपत्रिकेत अक्षर बदल व शाईबदल दिसून येत आहे. या विद्यार्थ्यांनी संबंधित उत्तरपत्रिकेवरील बदल झालेले अक्षर आमचे नाही, असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
उत्तरपत्रिकेच्या तपासणीत काही विद्यार्थ्यांच्या लेखनात प्रश्नपत्रिकेशी संबंधित मजकुराऐवजी अन्य बाबी आढळून आल्या आहेत. जशा की मोबाईल फोन नंबर वगैरे. शाईमध्येही फरक दिसून आला. अशा किंवा ज्यांच्यावर परीक्षेदरम्यान कॉपी आदी संबंधित कारवाई करण्यात येते, अशांना मंडळाकडून पाचारण केले जाते व चौकशी केली जाते. पैकी अक्षरबदलाशी संबंधित कारणांतर्गत विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले, त्यांचे लेखी म्हणणे बोर्ड घेत आहे.