‘सांसद आदर्श ग्राम योजने’त महाराष्ट्राची पिछेहाट!

टॉप पाच मध्ये एकही नाही
‘सांसद आदर्श ग्राम योजने’त महाराष्ट्राची पिछेहाट!

औरंगाबाद - Aurangabad

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या स्वप्नातील ग्रामीण भारत घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सुरू केलेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेचा महाराष्ट्रात (Maharashtra) फज्जा उडाला आहे. पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या गावांमध्ये 5 वर्षात केवळ 63 टक्के प्रकल्प पूर्ण झाले. महाराष्ट्र तर योजनेत सपशेल नापास असून अवघ्या 38 टक्के प्रकल्प पूर्ण होवू शकले. केंद्राच्या उत्कृष्ट गावांच्या यादीत टॉप 5 मध्ये राज्यातले एकही नाही. तर सुमार कामगिरी करणाऱ्या 18 (Gram Panchayat) ग्रामपंचायतीपैकी 4 महाराष्ट्रातील आहे, हे विशेष.

पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी केलेल्या भाषणात "सांसद आदर्श ग्राम योजने’ची घोषणा केली होती. यात प्रत्येक खासदाराने 2016 पर्यंत एक आणि 2019 पर्यंत 2 अशी 3 गावे दत्तक घेवून ती आदर्श म्हणून विकसीत करायची होती. 11 ऑक्टोबर 2014 ला योजनेची सुरूवात झाली. यासाठी देशातील 2207 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. 1683 पंचायतींनी ग्राम विकास योजना तयार करून 81739 योजनांचे प्रस्ताव सादर केले. पैकी 55524 (63.03 टक्के) कामे पूर्ण झाली तर 6534 सुरू आहेत.

महाराष्ट्राची पिछेहाट

आदर्श ग्राम तयार करताना पेयजल, शौचालय, वीज पुरवठा, रस्ते, टेलिफोन कनेक्शन आणि अन्य सुविधा अशा 6 श्रेणीतील कामांवर भर देण्यात आला होता. राज्यात या 6 श्रेणीत 1091 प्रकारची कामे प्रस्तावित होती. पैकी अवघे 358 (32.8 टक्के) पूर्ण झाले. 116 प्रकल्पांचे काम सुरू आहे. तर 617 म्हणजेच 56.53 टक्के प्रकल्पांना सुरूवात झालेली नाही. अन्य सुविधात अंगणवाडी, वृक्षारोपन, आरोग्य सुविधा, ज्येष्ठ नागरिक, सैनिक, शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान आदींचा समावेश आहे.

आठ गावांचा समावेश

परिणामकारकरित्या योजना राबवलेल्या107 गावांची यादी केंद्राच्या संकेतस्थळावर आहे. यात महाराष्ट्रातील 8 गावांचा समावेश आहे. पैकी 4 गावे देशात सर्वात सुमार कामगिरी करणाऱ्या 18 गावांपैकी एक आहेत. यात नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील किरतांगली, बुलढानाच्या जळगाव जामोद येथील धानोरा, चंद्रपूरचे भद्रावतीचे वायगाव तुकूम आणि वाशीमच्या मालेगावचे मैरळडोह ग्राम पंचायतीला अवघे 15 टक्के मार्क आणि 107 पैकी 89 वा क्रमांक आहे. उर्वरीत 4 गावात (Nashik) नाशिकचे शिलापूर-63.29 टक्के, दिंडोरीतील अवनखेड-57.64 टक्के, (Nandurbar) नंदूरबारच्या शहादेतील कोंढावल – 46.25 टक्के, औरंगाबादचे हातमाळी-30टक्के यांचा समावेश आहे., पहिल्या 5 मध्ये राज्यातील एकही गाव नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com