औरंगाबाद - aurangabad
जिल्ह्यातील वैजापूर (Vaijapur) व गंगापूर (Gangapur) तालुक्यात परतीच्या पावसामुळे (rain) नुकसान झालेल्या पिकांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पंचनामा करत असताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव, रांजणगाव तर वैजापूर तालुक्यातील भुगाव, लाडगाव , नांदूरढोक,कापूस वडगाव या गावातील शिवार परिसरातील शेत बांधावर जाऊन मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आमदार प्रा. रमेश बोरणारे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाढे, पं. स.माजी सभापती बाबासाहेब जगताप, गंगापूर तहसीलदार सतीश सोनी, गंगापूर तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, वैजापूर तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, गंगापूर गटविकास अधिकारी विजय परदेशी, वैजापूर गटविकास अधिकारी हरकळ यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.