औरंगाबाद - Aurangabad
म्युकरमायकोसिस संदर्भात राज्यातील टास्क फोर्सच्या बैठकीत अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सांगितल्याप्रमाणे हा आजार संसर्गजन्य रोग नाही. मात्र, केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांमध्ये हा आजार संसर्गजन्य रोग जाहीर करण्याचे सांगितले आहे. मात्र, या संदर्भात पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीने टास्क फोर्सच्या बैठकीत हा मुद्दा ठेवून त्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती टोपे यांनी दिली.
राजेश टोपे यांनी या आजाराविषयीच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर नियंत्रण अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि प्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या औषधाचा वापर करताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना टास्क फोर्सने दिल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
' म्युकरमायकोसिस 'वर संपूर्ण राज्यातील शासकीय रुग्णालयात तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना संलग्न असलेल्या रुग्णालयात संपूर्ण मोफत औषधोपचार आणि अकरा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या उपचारासाठी दीड लाख रुपये खर्चाच्या मर्यादेत सरकारच्या वतीने विशेष बाब म्हणून वाढ केली आहे, याचे शासकीय आदेश देण्यात आले आहेत. तसेच, म्युकरमायकोसिस होऊ नये म्हणून सरकारच्या वतीने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे दिली. म्युकरमायकोसिस हा आजार संसर्गजन्य आहे की नाही, यावरून निर्माण झालेल्या संभ्रमावरही टोपे यांनी यावेळी महत्त्वाची माहिती दिली.
करोना प्रतिबंधात्मक लस, रेमडेसिवीर, ऑक्सिजन यांसह अन्य औषधे खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने जागतिक पातळीवर निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या मान्यतेच्या खूप मोठ्या प्रक्रियेच्या अडचणी येत आहेत, हीच आमची हतबलता आहे, असेही टोपे यांनी यावेळी सांगितले.