औरंगाबाद- राज्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका आहे. पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्राच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविलेला आहे. बंगालच्या उपसागरापासून ते तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
सर्वात लांबलेला मान्सून संपला, आता परतीचा प्रवास
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे. कोकण आणि मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार, तर बहुतांश भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा जोर राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
मराठवाड्यात रेड अलर्ट
3 ऑक्टोबरला औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
4 ऑक्टोबरला औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान सल्ला पत्रकात वर्तवण्यात आली आहे.