ऐतिहासिक अजिंठा-वेरूळ या तारखेपर्यंत राहणार बंद 

jalgaon-digital
2 Min Read

औरंगाबाद – Aurangabad

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. करोनाबाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी व बाधितांची वाढती साखळी तोडण्यासाठी केंद्रीय पुरातत्व खात्याने देशभरातील वारसास्थळे, वस्तूसंग्रहालये १५ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा, वेरुळच्या लेण्या, बीबी का मकबरा, दौलताबादचा किल्ला ही स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

राज्यातच नव्हे तर, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. देशातील बहुकेत राज्यात करोनाबाधितांची संख्या आता वाढू लागली आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण अधिक असल्यामुळे राज्य शासनाने एक मेपर्यंत ‘ब्रेक द चेन’अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासाला मुभा देण्यात आली आहे.

राज्यात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गची स्थिती निर्माण झाली,त्यामुळे शासनाने टप्प्या टप्प्याने लॉकडाउन पुकारला होता. त्यामुळे वारसास्थळे, पर्यटन स्थळे, वस्तूसंग्रहालये बंद ठेवण्यात आली होती. औरंगाबाद जिल्ह्यात ही बंदी डिसेंबरपर्यंत होती. राज्यातील इतर जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र सुरु झाले असले तरी औरंगाबाद जिल्ह्यात त्याला परवानगी देण्यात आली नव्हती.

पर्यटन क्षेत्रातील संबंधितांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी डिसेंबर महिन्यात पर्यटन स्थळे खुली करण्यास मान्यता दिली. डिसेंबर आणि जानेवारी अशी दोन महिने पर्यटन स्थळे सुरु होती. त्यानंतर करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळे बंद केली. त्यानंतर राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लागू करुन संचारबंदी लावली. त्यामुळे एक मेपर्यंत राज्यातील पर्यटन स्थळे बंद झाली. आता केंद्रीय पुरातत्व खात्याने १५ एप्रिल रोजी आदेश काढून १५ मे पर्यंत केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असलेली देशभरातील सर्व वारसास्थळे, पर्यटनस्थळे, वस्तूसंग्रहालये बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.

औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा, वेरुळच्या लेण्या, बिबी का मकबरा, दौलताबादचा किल्ला, पानचक्की १५ मे पर्यंत बंद राहतील असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *