औरंगाबाद – aurangabad
श्रीकृष्ण मंदिर (Shrikrishna Temple) महानुभाव आश्रम ट्रस्टच्या (Mahanubhav Ashram Trust) वतीने रविवारी (२७ मार्च) जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने ज्ञानशक्ती स्वीकार दिन महोत्सव व पंचवतार उपहार महोत्सवाचे आयोजन महानुभाव आश्रम आणि संत एकनाथ (Saint Eknath) रंगमंदिरात करण्यात आले आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्यान सत्राचेही आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे असतील. महानुभाव संप्रदायातील आचार्य, संत-महंत, साहित्यिक, प्रवचनकार, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सानिध्यात हे कार्यक्रम होणार आहेत.
शहराचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महानुभाव आश्रमातील श्रीकृष्ण मंदिरात वर्षभर विविध उपक्रम घेतले जातात. दरवर्षीप्रमाणे यंदा ज्ञानशक्ती स्वीकार दिन व पंचवतार उपहार महोत्सव २७ मार्च (सौर चैत्र ६/५१२४) रोजी कवीश्वर कुलभूषण महंत राहेरकरबाबा महानुभाव तरडगाव यांच्या अध्यक्षतेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्यान सत्र आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ७ अशा दोन सत्रात हा सोहळा होईल. यावेळी आचार्य तुषार भोसले (प्रदेशाध्यक्ष, भाजपा अध्यात्मिक आघाडी) यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम ट्रस्टच्या अध्यक्षा कवीश्वर कुलभूषण महंत नागराज बाबा कपाटे महानुभाव यांचीही उपस्थिती असेल.
ग्लोबल महानुभाव संघ या कार्यक्रमाचे आयोजक असून माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्वागताध्यक्षाची जबाबदारी घेतलेली आहे. संपूर्ण कार्यक्रमात प्रवेशासाठी नोंदणी करवून घेतली जात आहे. पैठण रोडवरील महानुभाव आश्रम येथे प्रवेशिका ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती सुदर्शन महाराज कपाटे महानुभाव यांनी दिली.
श्रीकृष्ण जन्मभूमीवर व्याख्यान
यावेळी मुख्य व्याख्याते, विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे ‘श्रीकृष्ण जन्मभूमी’वरील व्याख्यान कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार आहे. तत्पूर्वी, ‘द इनर वर्ड’ या नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आला आहे. ज्ञानशक्ती स्वीकार दिन व पंचावतार उपहार महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी औरंगाबाद जिल्हा महानुभाव परिषद, श्रीचक्रधर सेवा मंडळ, सर्वज्ञ भजन मंडळ, राऊळ महिला मंडळ, श्रीकृष्ण युवा संघ, बजाजनगर-म्हाडा कॉलनी-वाळूज येथील श्रीकृष्ण मंदिर, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमांचा लाभ जास्तीत जास्त औरंगाबादकरांनी घेण्याचे आवाहन ग्लोबल महानुभाव संघाच्या वतीने करण्यात आले आहे.