औरंगाबाद – Aurangabad
कोरोनामुळे औरंगाबाद आरटीओ कार्यालयाच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. मागील वर्षभरात कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने तब्बल 100 कोटी रुपयांनी महसूल घटला आहे.
राज्य सरकारला मोठा महसूल मिळवून देणार्या विभागात आरटीओ कार्यालयाचा क्रमांक वरचा आहे. औरंगाबाद आरटीओ कार्यालयामार्फत वाहनांवरील केल्या जाणार्या दंडात्मक कारवाया तसेच विविध प्रकारचे शुल्कापोटी मिळणारी रक्कम मोठी म्हणजे साधारण तीनशे कोटीच्या जवळपास असते.
मागील वर्षात म्हणजे सन 2020-21 मध्ये आरटीओ कार्यालयाला कोरोनापूर्वीच 276 कोटी रुपयांचे टार्गेट दिले होते. कोरोनामुळे पुन्हा हे टार्गेट कमी करुन 175 कोटीचे दिले. आरटीओ कार्यालयाने मार्चअखेर यात 181 कोटी रुपयांची वसुली केली आहे. महसुलावर परिणाम होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कार्यालयाने डिसेंबर ते मार्च दरम्यान वसुलीचा धडाका लावला होता. डिसेंबर ते मार्च दरम्यान साधारण शंभर कोटीपेक्षा अधिक वसुली केली. कोरोनाच्या संकटातही औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने 181 कोटी रुपयांची वसुली केली आहे.