औरंगाबाद Aurangabad
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जी-२० परिषदेअंतर्गत विदेशी पाहुण्यांचे शिष्टमंडळ औरंगाबादेत येणार आहे. या अनुषंगाने शहरात कोट्यवधी रुपयांची सुशोभीकरणाची विविध विकासकामे होत आहेत. या कामांमुळे शहराला नवीन लूक मिळाला आहे. आता या सुशोभीत भिंती, उड्डाणपूल आणि चौकांमध्ये विद्रुपीकरण (disfigurement) केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. प्रसंगी थेट फौजदारी गुन्हे (Crimes) देखल दाखल केले जातील, असा इशारा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला.
जी-२० परिषदेचा बहुमान यंदा भारत देशाला मिळाला आहे. या परिषदेअंतर्गत महिला प्रतिनिधी बैठक फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात औरंगाबाद शहरात होणार आहे. या बैठकीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. संपूर्ण शहरातील विविध मार्गांवर सुशोभीकरण केले जात आहे. त्यासाठी राज्य सरकारने औरंगाबाद पालिकेला ५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यातून मुख्य रस्त्यांची डागडुजी, दुभाजकांचे सुशोभीकरण, रंगरंगोटी, चौकांचे सुशोभीकरण, फूटपाथची कामे, ठिकठिकाणी दुभाजकांमध्ये मोठ-मोठी झाडे लावणे, उड्डाणपुलांवर आकर्षक रोषणाई करणे आदी कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच रस्त्यांवर स्वच्छता राहील, यासाठी नियमितपणे साफसफाई देखील केली जात आहे.
दुभाजकांलगतची माती उचलणे, रस्त्यालगत मोठमोठे स्वागत फलक लावणे यावरही भर दिला जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहराचा चेहरा बदलत आहे. हा बदलेला चेहरा कायम राहावा, यासाठी देखील पालिका प्रशासन प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच आता रस्त्यांलगत, चौकांमध्ये तसेच उड्डाणपुलांवर पोस्टर, बॅनर चिकटविणारे, थुंकणारे, अतिक्रमण थाटणारे तसेच दुभाजकांतील झाडे, सार्वजनिक रस्त्यांवरील रोषणाई, ग्लो गार्डन, कारंजे आदींचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. गरज भासल्यास अशा संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नमूद केले.