औरंगाबाद – aurangabad
(corona) लस घेण्यासाठी आल्यानंतर रांगेत जास्त वेळ थांबावे लागू नये, म्हणून लसीकरणाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. आता १६ तास विविध केंद्रांवर लस घेता येणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी प्रशासनाने सक्तीचे धोरण अवलंबल्यामुळे मागील काही दिवसांपासून लसीकरण केंद्रावर लोकांची गर्दी होत आहे. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेऊन आता शहरातील दहा ठिकाणी सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या वेळेनुसार लस घ्यावी अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
याविषयी सविस्तर माहिती देताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, सध्या शहर व जिल्ह्यात मिळून दररोज ३७ हजार लोकांना लस देण्यात येत आहे. शहरासह ग्रामीण भागातही लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या केंद्रावर मिळणार १६ तास लस
• कैसर कॉलनीमध्ये दोन केंद्रावर,
• सिल्कमिल कॉलनीत २ केंद्रांवर,
• सिडको एन-८ जिल्हा रुग्णालय,
• बीबी का मकबरा,
• जवाहर कॉलनी,
• आरिफ कॉलनी,
• घाटी व जिल्हा रूग्णालय.
नागरिकांना वरील लसीकरण केंद्रावर सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत लस घेता येईल. तसेच आता तालुक्याची ठिकाणी व जिल्ह्यातील मोठ्या गावातही लसीकरणाचा वेळ वाढवून मिळणार आहे.