औरंगाबाद – Aurangad
औरंगाबाद शहरात वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महापालिका विविध प्रभावी उपायोजना राबवत आहे. अधिकाधिक नागरिकांच्या चाचण्या व लसीकरणावर भर दिला आहे. त्यास वॉर्डातील नगरसेवक व नागरिकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. यामुळे कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचा दावा पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी केला. आगामी संभाव्य कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता गृहीत धरून त्याचेही नियोजन पालिकेने केले असून तिसरी लाट रोखण्यातही यश येईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
आयुक्त पांडेय यांनी शहरातील लोकप्रतिनिधींसाठी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या अनुषंगाने चर्चा झाली. माजी महापौर, उपमहापौर, इतर पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी यात संवाद साधला. त्यांच्या सूचना ऐकून घे घेत प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांविषयी आयुक्त पांडेय यांनी माहिती दिली. गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेचा मुकाबला करताना अनेक अडचणी आल्या. कन्टेनमेंट झोन तयार करून पालिकेने हाती घेतलेल्या विविध उपाययोजना कामी आल्या. परिणामी, कोरोना संसर्ग आटोक्यात आणला होता.
मात्र कोरोनाच्या दुसर्या लाटेने शहराला विळखा घातला आणि यातही प्रशासनाने उपायोजना अधिक प्रभावीपणे राबवून संसर्गावर नियंत्रण मिळवण्यास यश येत आहे. आयुक्तांनी नमूद केले की, आता तिसर्रया लाटेसाठी प्रशासन सज्ज आहे. खासगी रूग्णालयाच्या मदतीने ऑक्सीजन क्षमता वाढविण्याचे काम केले आहे. जेणेकरून गंभीर कोरोना रुग्णांची आवश्यक ती काळजी घ्यावी लागेल. पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आमच्या मागणीची दखल घेत औरंगाबादमध्ये दोन ऑक्सीजन प्लांट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. औद्योगिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी बेड वाढवण्यासाठी गरवारे यांनी आपले शेड दिले आहे. वॉररूम रुग्णवाहिका व्यवस्थापन, बेड मॅनेजमेंट, हॉस्पिटल डिस्चार्ज मॅनेजमेंट आणि हेल्थ माझ्या हाती मोबाईल अॅपच्या माध्यमातून बेडची उपलब्धता करून देण्यात येत आहे.