औरंगाबाद - aurangabad
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) (पीएम - किसान) हा केंद्र शासनाचा (Central Govt) महत्वाकांक्षी उपक्रम आहे. ७ सप्टेंबरपर्यंत या उपक्रमांशी संबंधित डेटा एंट्री व केवायसी (kyc) अद्यावत करण्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. महसुल, ग्रामविकास व कृषि विभागातील सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांनी हे काम एकत्रितपणे पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी (Collector) सुनील चव्हाण यांनी दिले. तसेच जे तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक हे काम करण्यात दिरंगाई करतील अशा कर्मचाऱ्यांविरुध्द गंभीर स्वरुपाची प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
सिल्लोड व सोयगाव तालुक्यांचा या कार्यक्रमातील प्रगतीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. १२ वा हप्ता वाटप करण्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांचे जमिनीबाबतच्या महसुली नोंदी पुर्ण करणे तसेच शेतकऱ्यांचे बॅंक खात्याचे इ.केवायसी पुर्ण करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केलेल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात या दोन्ही बाबी फार मोठ्या प्रमाणावर प्रलंबित होत्या. या अभावी जिल्ह्यातील शेतकरी प्रस्तावित हप्त्याचे लाभापासुन वंचित राहणार होते. जिल्हाधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे आजपर्यंत डेटा एन्ट्रीचे ६३ टक्के तर केवायसीचे काम ६९ टक्के पूर्ण झालेले आहे. हे काम केंद्र शासनाने घालून दिलेल्या मुदतीत म्हणजेच ७ सप्टेंबर पर्यंत होणे गरजेचे आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम - किसान) या केंद्र शासनाचे उपक्रमात अल्प/अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना प्रतिवर्ष रु. ६००० (रु. २००० चे समान तीन हप्त्यांत) प्रमाणे सन्मान निधी शेतकऱ्यांचे बॅंक खात्यावर थेटपणे जमा करते. आजपावेतो या उपक्रमात ११ हप्ते वाटप केलेले आहेत. १२ वा हप्ता २५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान महोदयांच्या हस्ते वितरीत होणार आहे.
या आढावा सभेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, उप विभागीय अधिकारी संदीप पाटील, दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार, गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी व त्यांचे अधिनस्त सर्व क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.