औरंगाबाद- Aurangabad
कोविड काळात सोशल डिस्टेंसिंगच्या नियमाचे पालन न केल्याबद्दल औरंगाबाद महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने जालना रोडवरील हॉटेल अजंता अँबेसेडरला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
राज्य व केंद्र सरकारने कोरोनाबाबतच्या ठरवून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी, याकडे पालिकेचे प्रशासन लक्ष देत आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी माजी सैनिकांचे नागरी मित्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाने हॉटेल अजंता अँबेसेडर येथे लग्न समारंभाची पाहणी केली. या लग्न समारंभात शासन निर्देशानुसार सामाजिक अंतर न राखणे, जास्त गर्दी करणे या कारणावरून हॉटेल व्यवस्थापनाला २५ हजार रुपयांचा दंड केला व तो वसूल देखील केला.
शहरात मास्क न घालता फिरणाऱ्या १०६ नागरिकांवर देखील पालिकेच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. प्रत्येकी पाचशे रुपये या प्रमाणे ५३ हजार रुपये वसूल करण्यात आले. रस्त्यावर थुंकणाऱ्या २२ नागरिकांकडून प्रत्येकी शंभर रुपये या प्रमाणे २२०० रुपये, कचरा टाकणाऱ्या पाच नागरिकांकडून एकूण ७५० रुपये वसूल करण्यात आले. दिवसभरातील कारवाईतून ५६ हजार ५५० रुपये वसूल करण्यात आले.