सातपूर । प्रतिनिधी Satpur
निमा निवडणुकीचा वाद सध्या शांत वाटत असला तरी दोन्ही गटांकडून सुप्त हालचाली सुरू असल्याने ही वादळापूर्वीची शांतता असल्याची चर्चा उद्योगक्षेत्रात आहे.
निमा निवडणुकीसाठी निवडणूक समितीच्या निवडीवरच विद्यमान पदाधिकार्यांनी आक्षेप घेतला होता. कार्यालयीन कामकाज करू न देणे, फलकावर सूचना लावून देणे अशा काही अडथळे उभे केले जात असल्याचे वृत्त मध्यंतरी येत होते.
दि.३१ जुलै रोजी विद्यमान पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काळजीवाहू पदाधिकारी म्हणून आम्हीच कार्यरत राहणार असल्याचे सांगून, विद्यमान संचालक मंडळाने विश्वस्त समितीवर व व त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.
नंतरच्या काळात निमाची घटना अस्तित्वात नसल्याचा दावा केल्याने १९८२ नंतरचे सर्व अध्यक्ष व पदाधिकारी रद्दबातल होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळाने काळजीवाहू समिती स्थापन करून दि. १ ऑगस्टपासून त्यांचे कारभार सुरू झाल्याचे पत्र अदा केले होते.
निमा कार्यालयात दोन अध्यक्ष झाल्याने वादाचा प्रसंग उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून विद्यमान संचालक मंडळाने रविवारी १० ते १२ सुरक्षारक्षक, बाउन्सर प्रवेशद्वारावर तैनात केले व त्यानंतर १४ दिवसांसाठी निमा कार्यालय कॉरंटाईन केल्याची सूचना फलकावर लावली तश्या आशयाचा फलक दारावरही लावण्यात आला.
या पार्श्वभूमीवर निमात सुरू झालेल्या संघर्षाची ठिणगी गंभीर रूप घेऊ शकते असा विचार करून काही पदाधिकार्यांनी समन्वय घडवण्यासाठी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात मध्यस्थी करणार्या व्यक्तींची नावे समोर आलेली नाहीत. मध्यस्थी साठी कोण कोणाशी बोलत आहे यासंदर्भातही वृत्तांत समोर येत नसल्याने ही वस्तुस्थिती आहे की अफवा असा प्रश्न निर्माण होत आहे.