औरंगाबाद - aurangabad
डाक विभागाने (Department of Posts) नुकताच टाटा एआयजी (Tata AIG) आणि बजाज अलायन्स कंपनी (Bajaj Alliance Company) सोबत करार करत ग्राहकांसाठी ३९९ रुपयांत अपघाती विमा (Accident insurance) योजना आणली. यात अल्पावधीत १० हजार ९०० खाते उघडून देशात पहिल्या टॉप टेनमध्ये येण्याचा बहुमान मिळविला आहे. याबद्दल अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेच्या (Postal Employees Union) वतीने प्रवर अधीक्षक ए. के. धनवडे यांचा सत्कार करण्यात आला.
टपाल विभागाने ३९९ रुपये घेऊन टाटा एआयजीसोबत तर ३९७ रुपये घेऊन बजाज अलाईन्स कंपनीसोबत या अपघाती विमा योजनेसाठी करार केला. ही विमा योजना नागरिकांच्या फायद्याची असल्याने नागरिकांचा यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेत काम करणाऱ्या पोस्टमनला प्रत्येकी १३ रुपये दिले जातात. तर टपाल खात्याला १० टक्के रक्कम मिळते. त्यामुळे अल्पावधीत ही योजना लोकप्रिय झाली.
औरंगाबाद विभागातील पोस्टमन व एमटीएस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत योजना घराघरांत पोहचवली. यासाठी प्रवर अधीक्षक ए.के. धनवडे यांचे मार्गदर्शन कर्मचाऱ्यांना मिळाले. एकूण १० हजार ९०० खाते उघडून देशातील पहिल्या १० कार्यालयांमध्ये औरंगाबादला बहुमान मिळाला. औरंगाबाद विभागाला मिळालेल्या या बहुमानामुळे औरंगाबादचे डाक प्रवर अधीक्षक ए.के. धनवडे यांचा ऑला इंडिया पोस्टल एम्प्लॉईज संघटना, पोस्टमन व एमटीएसच्या वतीने संघटनेचे नेते देवेंद्र परदेशी, संजय सोनवणे, पाराजी जाधव, एल.एस. बजाज, सय्यद ताज, वैजीनाथ सहानी, आनंद बहोत, सुनील शिंदे, यकीन होख व संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.