Friday, April 26, 2024
HomeUncategorizedपुण्यात सवाई गंधर्वची घाई; पर्यटन राजधानीत ओमिक्रॉनचा बहाणा

पुण्यात सवाई गंधर्वची घाई; पर्यटन राजधानीत ओमिक्रॉनचा बहाणा

औरंगाबाद – aurangabad

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू ठरलेल्या वेरूळ-अजिंठा महोत्सवास (Ellora-Ajanta Festival) रसिकांना यंदा पुन्हा मुकावे लागणार आहे. (corona) कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे शिथील झाल्याने पुण्यात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. मात्र, राज्याच्या पर्यटन राजधानीत वेरूळ महोत्सवाच्या आयोजनाबाबत बैठकही झालेली नाही. त्यातच राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Minister of State Abdul Sattar) यांनी त्यांच्या मतदारसंघात “अजिंठा महोत्सव’ घेण्याची घोषणा केल्याने वेरूळ महोत्सवाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -

१९८६ पासून वेरूळ महोत्सवाचे आयोजन केले जाते. सुरूवातीला वेरूळच्या कैलास लेणीसमोर होणारा महोत्सव २००२ पासुन विद्यापीठातील सोनेरी महालात होवू लागला. २००७ पर्यंत तो दरवर्षी उत्साहात पार पडायचा. नंतर वेगवेगळ्या कारणांनी महोत्सव रद्द होत गेला. १५ वर्षात केवळ ३ महोत्सव होवू शकले हे विशेष.

१५ वर्षात ३ महोत्सव

२००७ – महोत्सव झाला

२००८ – मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यामुळे रद्द

२००९ – स्वाईन फ्लुच्या साथीमुळे रद्द

२०१० – शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक आचारसंहीतेमुळे रद्द

२०११ – महोत्सव रद्द

२०१२- कुणाल कुमार यांनी २०११ चा महोत्सव २६-२९ जानेवारी २०१२ दरम्यान घेतला

२०१३- कुणाल कुमार प्रशिक्षणासाठी परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे रद्द

२०१४-महोत्सवाच्या काळात पोलिस निधी व जाकिर हुसैन यांचा कार्यक्रम. नंतर निवडणूका, दुष्काळामुळे रद्द

२०१५-महोत्सव रद्द

२०१६- १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान आयोजन

२०१७, २०१८, २०१९-महोत्सव रद्द

२०२०- कोरोना

२०२१- ओमिक्रॉन व्हेरियंटचा धसका

वेरूळ महोत्सवासाठीच कारणे

१ डिसेंबरपासून नाट्य व चित्रपटगृहांवरील बंधने उठवत १०० टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेशास परवानगी मिळाली. पं. भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव घेण्यास आयोजक आग्रही होते. सरकारने २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान महोत्सवाला परवानगी दिली. २००९ मध्ये स्वाईन फ्लुमुळे वेरूळ महोत्सव रद्द झाला असतांना सवाई गंधर्व महोत्सव उशीराने घेण्यात आला. वेरूळ महोत्सवाच्या बाबतीत मात्र, असे निर्णय होत नाहीत.

आता आयोजन अशक्यच

आंतरराष्ट्रीय स्तराच्या महोत्सवाची तयारी ४-६ महिने आधी करावी लागते. कलाकार, तारखा निश्चीत झाल्यावर टूर कंपन्या, पर्यटन खाते याची प्रसिद्धी करते. पर्यटन कॅलेंडरमध्ये त्याचा समावेश होतो. देशी-विदेशी पर्यटक महोत्सवाचे औचित्य साधून टूर ठरवतात. २०२१ संपायला आठवडा शिल्लक आहे. याबाबत बैठकही झाली नसल्याने महोत्सव रद्द झाल्यात जमा आहे.

तीन खात्यांची जबाबदारी

पर्यटन खाते, सांस्कृतीक खाते आणि जिल्हा प्रशासन महोत्सवाचे आयोजन करतात. विभागीय आयुक्त महोत्सवाचे मानद अध्यक्ष असतात. सुरूवातीला वेरूळ-अजिंठा महोत्सव समिती आयोजनात सहभागी होत असे. २०१२ नंतर समितीच्या भूमिकेला विराम देण्यात आला. जिल्हा प्रशासन व्यवस्थापन करू लागले. एमटीडीसीची भूमिका प्रसिद्धीपुरती उरली.

सत्तार यांची वेगळी चूल

गेल्या आठवड्यात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त अजिंठा लेणीच्या पायथ्याशी अजिंठा महोत्सव घेण्याची घोषणा केली. हा महोत्सव यशस्वी झाला तर दरवर्षी अजिंठा महोत्सव घेण्याचे संकेतही दिले. वेगळ्या महोत्सवाचा पायंडा पडला तर वेरूळ महोत्सव अडचणीत येवू शकतो, असे तज्ञांना वाटतंय.

महोत्सव झालाच पाहिजे

वेरूळ महोत्सवामुळे देश-विदेशात नावाजलेल्या कलाकारांना अनुभवण्याची संधी मिळते. परंतू तो सातत्याने रद्द होत असल्याने कलाकार, रसिकांचा हिरमोड होतो. इतर शहरांप्रमाणे आपल्याकडेही महोत्सव झालाच पाहिजे.

– आरती पाटणकर, शास्त्रीय कलावंत

- Advertisment -

ताज्या बातम्या