औरंगाबाद – aurangabad
भलेही कोरोना (corona) संसर्गकाळ संपला असला तरी कोरोनाशी प्रतिकार करू शकणाऱ्या लसीचे डोस पूर्ण करावे असे डॉक्टरांकडून वारंवार सांगितले जात आहे. परंतु दुसरा डोस आणि बूस्टर डोस (Booster dose) घेण्यात औरंगाबादकर अजिबातच रस दाखवत नसल्याचे एकंदर चित्र आहे.
Visual Story श्रध्दा कपूरचा ट्रॅडिशनल लुक
कोरोना संसर्गाच्या नवीन व्हेरिअंटने इंट्री केल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. लसीकरणाचा आढावा घेतला जात आहे. औरंगाबाद महापालिकेच्या क्षेत्रात अकरा लाख ७० हजार ९०७ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दीष्ट आहे, या पैकी आतापर्यंत फक्त एक लाख २ हजार ६९६ नागरिकांनीच बूस्टर डोस घेतला आहे असे स्पष्ट झाले आहे. सुमारे चार लाख नागरिकांनी लसीचा दुसरा डोसही घेतलेला नाही.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्यामुळे शासकीय व प्रशासकीय यंत्रणांनी लसीकरणावर जोर दिला आहे. करोना संसर्गाचा धोका होता तोपर्यंत लसीकरणाला बऱ्यापैकी प्रतिसाद नागरिकांकडून मिळत होता. परंतु काही महिन्यांपासून करोनाचा धोका कमी झाला. शासनाने देखील सर्व निर्बंध उठवले, त्यामुळे नागरिकांना मोकळीक मिळाली आणि लसीकरणाचा विषय मागे पाडला.
महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाच्या संदर्भात आरोग्य विभागाकडून माहिती घेतली असता महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी या बद्दलची माहिती दिली. महापालिका क्षेत्रात शासनाने अकरा लाख ७० हजार ९०७ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दीष्ट दिले आहे. ज्या नागरिकांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे त्या नागरिकांना बूस्टर डोस दिला जात आहे. करोनाच्या बदलणाऱ्या रूपाचा सामना करण्यासाठी बूस्टर डोस प्रभावी ठरेल असे मानले जात आहे. पण औरंगाबादमधील केवळ एक लाख दोन हजार ६९६ नागरिकांनीच बूस्टर डोस घेतल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या नऊ लाख ९२ हजार २१४ असून एक लाख ७८ हजार ६९३ नागरिकांनी अद्याप पहिला डोस देखील घेतलेला नाही. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या सात लाख ७८ हजार ७१५ असून तीन लाख ९२ हजार १९२ नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटशी सामना करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे.