विवाहित महिलांच्या मिसिंगची कारणे घरातच दडलेली!

पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे यांचे प्रतिपादन
सजग महिला संघर्ष समितीच्या वतीने आयोजित बैठकीत सहभागी मान्यवर
सजग महिला संघर्ष समितीच्या वतीने आयोजित बैठकीत सहभागी मान्यवर

औरंगाबाद - aurangabad

एखादी विवाहित महिला मिसिंग होते याची कारणे घरातूनच सुरू होतात. हल्ली अनेकांना घर असुरक्षित वाटायला लागले आहे. छोट्या-छोट्या कारणांमधून घरात होणारे वाद, बदलती जीवनशैली, स्त्रियांना मिळणारी असमानतेची वागणूक, स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक बाबी समजून न घेतल्याने महिला मिसिंग (Missing women) होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे, असे मत भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी केले.

सजग महिला संघर्ष समितीच्या वतीने रविवारी (२७ नोव्हेंबर) ''मिसिंग महिलांची वाढती संख्या, वास्तव, कारणे आणि कुटुंबातील असमानता'' या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पीआय तायडे यांनी मिसिंग महिलांबाबतची पार्श्वभूमी स्पष्ट केली. सोशल मीडियाचा वाढता वापर, चंगळवादी वृत्ती, विभक्त कुटुंब पद्धती, जुने प्रियकर, इतरांकडून मिळत असलेली सहानुभूती अशा अनेक कारणांमुळे महिला घर सोडतात. कुटुंबातील संवाद वाढल्यास, प्रत्येक वादावर चर्चा घडवून आणल्यास हे प्रमाण कमी होऊ शकते, असेही मत त्यांनी व्यक्त केले. अज्ञानीपणा, बालविवाह, आमिषाला बळी पडणे, मोठ्या पदावरची नोकरी अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. परंतु, घर सोडून गेल्यानंतर अनेक आव्हानांना त्या विवाहित महिलांना सामोरे जावे लागते. हे सगळं समजून घेणं अतिशय गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. योग्य वयात पूर्ण शिक्षण देणे, त्यांच्यात नीतिमत्ता, विवेक येऊ देणे महत्त्वाचेच असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला हवालदार लता जाधव यांनी देखील या विषयावर आपले मत व्यक्त केले. आपल्या घरातच सावली असते त्याकडे लक्ष द्यावे, असे त्या म्हणाल्या. घरातून मिसिंग होऊन जाण्याने प्रश्न सुटत नाही. या मुद्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.

आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी नम्रता फलके यांनी प्रेम आणि प्रेमसंबंध यातील फरक स्पस्ट केला. जेव्हा सुरक्षितता बाहेर वाटत नाही तेव्हा घरी यायला मार्ग राहत नाही. यातून अनेक प्रश्न उद्भवतात, असे मत मांडले. माजी नगरसेविका रेखा जयस्वाल यांनी स्त्रियांमध्ये असणाऱ्या आत्मविश्वासाची कमतरता यास कारणीभूत असते असे सांगताना घरात संवाद नसतो, असे यावर भाष्य केले. संजीवनी दिपके यांनी आपल्याकडे लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्याने, आकर्षणातून अशा घटना घडतात, असे सांगितले. जयश्री शेंडगे यांनी मुलांशी संवाद साधत मैत्री करण्याची गरज व्यक्त केली. मुलांना वेळ दिला तर सुरक्षित वाटेल. त्यातून मुलींना पळून जाण्याच्या भावनेला काहीअंशी आळा घालता येईल, अशी आशा व्यक्त केली. मंगल खिंवसरा यांनी विवाहित महिला मिसिंग होण्यामागची कारणे स्पष्ट करताना सामाजिक व्यवस्थेची दरी लक्षात न घेता त्यामागची मानसिकता, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे, असे नमूद केले. प्रेम करण्याला विरोध नाही परंतु प्रेम निभावले पाहिजे. ही क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे, असे त्यांनी सांगत वाळूज परिसरात मिसिंग महिलांवर भाष्य केले.

डॉ. रश्मी बोरीकर यांनी बैठकीचा समारोप केला त्या म्हणाल्या पालकत्वाची जबाबदारी ही आई-वडील दोघांची असते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी दोघांची भूमिका महत्त्वाची असते. तरुण मुले, पुरुषही मिसिंग होतात. परंतु, एखादी बाई मिसिंग होणे याचा संबंध त्या कुटुंबाची इज्जत, आब्रूशी जोडला जातो आणि त्यामुळे एखादी मिसिंग झालेली महिला कुटुंबात परत येऊ इच्छित असली तरी देखील तिला ते स्थान मिळत नाही. मुलीचे लग्न तिच्या मनाप्रमाणे लावून दिले तर कदाचित या घटना कमी होतील. त्यासाठी मुलींमध्ये धाडस निर्माण करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. शरीराच्या जाणिवा फार लहान वयात बदलत आहे. त्यामुळे देखील मुली मिसिंग होतात या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधले नैतिकता प्रत्येकाची वेगळी असते. एका चौकटीत त्याला बांधता येत नाही. नवीन आहे ती चौकट स्वीकारण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

या बैठकीस डॉ. शकुंतला लोमटे, ॲड. ज्योती पत्की, सुनीता जाधव, मीना खंडागळे, ॲड. जयश्री देशपांडे, स्मिता हस्तक, रूपाली बाविस्कर, डॉ. आरतीश्यामल जोशी, मंजुषा माळवतकर, पोलिस नाईक रूपा साकला, पोलिस नाईक संगीता परळकर, अंमलदार गिरीजा आंधळे, डॉ. चारुलता रोजेकर, मीना खंडागळे, ॲड. सुजाता पाठक, पत्रकार मंजिरी काळवीट, रजनी नागवंशी, सरस्वती जाधव, प्रा. विद्या पाटील, सामाजिक न्याय उपायुक्त जयश्री सोनकवडे, प्राजक्ता भोसले, गीता खांबेकर, डॉ. अनू मधाळे, कल्पना राजपूत आदींची उपस्थिती होती.

सीमा वानखेडे यांचा सत्कार
सिडको बसस्थानकात मध्यरात्री अल्पवयीन मुलगी पोलिस अंमलदार सीमा वानखेडे यांना दिसली. ही मुलगी घरातून पळून आली होती. प्रसंगावधान राखत सीमा यांनी भरोसा सेलच्या मदतीने त्या मुलीला सुखरूप घरी पोहचवले. त्याबद्दल सजगच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com